
गोळपेतील सौरऊर्जा प्रकल्पासाठी 8 कोटी 30 लाखाची निविदा
रत्नागिरी, ः जिल्हा नियोजनच्या पाच टक्के राखीव निधीतून रत्नागिरी तालुक्यातील गोळप येथे प्रस्तावित १ मेगावॅटच्या सौरऊर्जा प्रकल्पासाठी निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे. पुढील वर्षी प्रत्यक्षात वीज निर्मितीला सुरवात करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशानाकडून हालचाली सुरू आहेत. यासाठी ८ कोटी ३० लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पाची तांत्रिक निविदा ५ जून रोजी उघडण्यात येणार आहे.
अपारंपरिक ऊर्जा विकास कार्यक्रमांतर्गत रत्नागिरी जिल्हा परिषदेने सौरऊर्जा प्रकल्पांना प्राधान्य देण्याचे धोरण अवलंबले आहे. त्या अंतर्गत कृषी विभागाकडून गोळप येथे १ मेगावॅटच्या सौरऊर्जा प्रकल्पाचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. नोव्हेंबर २०२२ मध्ये महावितरण, गोळप ग्रामपंचायत व जिल्हा परिषदेच्या संयुक्त सर्वेक्षणानंतर प्रस्तावावर पुढील कार्यवाही सुरू झाली होती. या मार्फत ग्रामपंचायत, आरोग्य केंद्र, अंगणवाड्या व पथदीपांना वीजपुरवठ्याचा खर्च वाचण्याची अपेक्षा आहे. यासाठी सुमारे ७ कोटी रुपये खर्च अपेक्षित असून ग्रामपंचायतीच्या जागेत हा प्रकल्प उभा राहणार आहे. पुढील टप्प्यात प्रकल्पाची क्षमता वाढवून ३ मेगावॅटपर्यंत नेण्याचे गोळप येथील या प्रकल्पाला गती मिळाली असून यासाठीची निविदा प्रक्रिया सुरू आहे. येथे ग्राऊंड माऊंटेड सोलर पॉवर प्रोजेक्ट उभारण्यासाठीची ८ कोटी ३० लाख ६९ हजार २० रुपयांची निविदा जारी करण्यात आली आहे. यात प्रकल्प उभारणीसह विमा अपेक्षित आहे व ५ वर्षाची देखभालही समाविष्ट आहे. यासाठी १ जूनपर्यंत मुदत असून ५ जून रोजी सकाळी ११ वाजता तांत्रिक निविदा दरनिविदा उघडण्याची तारीख नंतर निश्चित करण्यात येणार आहे. यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार, अतिरिक्त मुख्या कार्यकारी अधिकारी पी. डी. यादव, कृषि विकास अधिकारी अजय शेंडे सातत्याने पाठपुरावा करत आहेत.
वीज ग्रीडला दिली जाणार
पालकमंत्री उदय सामंत यांनी गोळप येथे सौरऊर्जा करण्याला पाठबळ दिले होते. एका ग्रामपंचायत क्षेत्रात अशा प्रकारचा प्रकल्प उभारून वीजनीर्मीतीचा राज्यातील एकमेव प्रकल्प आहे. यातील वीज ग्रीडला दिली जाणार आहे. या संदर्भात संबधित यंत्रणेशी चर्चा झालेली असल्याचे जिल्हा परिषद कृषी विभागाकडून सांगण्यात आले.