
रत्नागिरी-कोल्हापूर चौपदरीकरण लवकरच
रत्नागिरी:- रत्नागिरी-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाचे काम लवकरच सुरू होणार आहे. यासाठीचे आवश्यक ते सर्व भूसंपादन पूर्ण झाले आहे. ठेकेदाराची नियुक्तीही झाली आहे. यामुळे रत्नागिरीतून पश्चिम महाराष्ट्रात वाहतूक जलद होऊन त्याचा नागरिक, उद्योजक व आंबा बागायतदार यांना मोठा फायदा होणार आहे. सुमारे पाऊण तास एवढ्या वेळेची बचत होणार आहे.
रत्नागिरी-कोल्हापूर-नागपूर या महामार्गापैकी चौपदरीकरणासाठी दोन हजार 114 कोटी रुपयांचा निधी मंजूर आहे. 134 कि.मी. रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी 667.13 हेक्टर जमीन संपादित केली आहे. पूर्वी कोल्हापूर शहरातून जाणारा हा महामार्ग आता केर्लीमार्गे (बायपास) वळविण्यात आला आहे. केर्ली- शिये-चोकाकमार्गे रत्नागिरी नागपूर या महामार्गास जोडला जाणार आहे.
रत्नागिरी ते आंबा या अंतरातील भूसंपादन पूर्ण झाले आहे. उर्वरित आंबा ते पैजारवाडी या 45 कि.मी. मार्गासाठी 170 हेक्टरचे भूसंपादन पूर्ण झाले आहे. पैजारवाडी ते चोकाक या 34 कि.मी.साठी 162.67 हेक्टरचे भूसंपादन पूर्ण झाले आहे.
या कामासाठी ठेकेदाराची निविदा मंजूर झाली असून त्याची वित्तीय परिस्थिती आणि बँक व्यवहार तपासणीचे कामही पूर्ण झाले आहे. ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्याने वर्कऑर्डर दिल्लीला अंतिम मंजुरीसाठी पाठविण्यात आली आहे. मंजुरीनंतर एक-दोन दिवसांत वर्कऑर्डर दिली जाणार आहे. त्यानंतर कामाला सुरुवात होणार आहे.