१३४ शिक्षकांच्या बदली रद्दचा निर्णय सीईओ यांच्या कोर्टात
रत्नागिरी :कोविडमधील परिस्थितीमुळे दोन वर्षे जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या झालेल्या नव्हत्या. यंदा 1 हजार 677 शिक्षकांच्या बदल्या झाल्या असून त्यांच्या कार्यमुक्तीचे आदेशही काढण्यात आले आहेत; मात्र 134 जणांनी बदली रद्दसाठी शिक्षण विभागाला साकडे घातले आहे. शिक्षण विभागाने त्यांची बाजू ऐकून घेतली असून त्यावरील निर्णय मुख्य कार्यकारी अधिकार्यांच्या कोर्टात ठेवण्यात आला आहे.
कोविडमुळे प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या लांबल्या होत्या. त्यानंतर ऑनलाईन बदलीसाठी तयार करण्यात येणार्या सॉफ्टवेअरसाठी एक वर्षाचा कालावधी लागला. मात्र यावर्षी शिक्षकांच्या बदल्या करायच्याच हा चंग शासनाने बांधला होता. त्यामुळे अनेक अडथळ्यांवर मात करत ही प्रक्रिया पार पाडण्यात आली. पात्र शिक्षकांना बदलीची माहिती ऑनलाईन पाठवण्यात येणार होती. मात्र प्रत्यक्षात मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशानुसार बदली आदेश काढले गेले आहेत. जिल्ह्यात शिक्षकांच्या बदलीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. यंदाही या बदल्या होणार की नाही, याबाबत शिक्षकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. हा संभ्रम आता दूर झाला आहे. जिल्ह्यातील तब्बल 1 हजार 677 शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. या शिक्षकांना कार्यमुक्ती आणि रुजू होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र 134 जणांनी या बदल्या रद्द कराव्यात अशी मागणी प्रशासनाकडे केली होती. शासनाने त्या शिक्षकांची बाजू ऐकून घ्या अशा सुचना दिल्या होत्या. त्यानुसार शुक्रवारी (ता. 19) दुपारी त्या शिक्षकांना बोलावण्यात आले होते. अनेक शिक्षकांनी वैयक्तिक कारणे दिली. त्यात काहींनी आजारपणाचे कारण पुढे केले. म्हणणे ऐकून घेण्यात आले असून, ती सर्व माहिती संकलित करून मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यापुढे ठेवण्यात आली आहे. त्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी निर्णय घेणार आहेत.
दरम्यान, येत्या आठवडाभरात बदली झालेल्या शिक्षकांना जुन्या शाळेतून कार्यमुक्त होऊन नव्या शाळेत रुजू होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. बदली झालेल्या शिक्षकांना नव्या नियुक्तीचे ठिकाण मिळणार असून नव्या शैक्षणिक वर्षापासून नवीन ठिकाणी गुरूजी हजर होणार आहेत. आंतरजिल्हा बदल्या झाल्यामुळे रिक्त पदांची संख्येत भर पडलेली आहे. त्यामुळे मुले अधिक आणि शिक्षक कमी अशी स्थिती असलेल्या शाळांमध्ये जुन महिन्यात शिक्षण विभागाला काही शिक्षकांना कामगिरीवर काढावे लागणार आहे.