
जिल्हा नियोजनचा निधी खर्ची टाकण्यात जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर
रत्नागिरी :यंदा जिल्ह्याची शासकीय वसुली उच्चतम ९२ टक्के झाली आहे. १२० कोटींपैकी १११ कोटींची वसुली करण्यात आली आहे. आतापर्यंतच्या वसुलीत यावर्षी विक्रमी वसुली झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी दिली. यावर्षी जिल्हा वार्षिक योजनेचा निधी १०० टक्के खर्च करण्यात रत्नागिरी जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर आहे.
जिल्हा प्रशासनाच्या महसूल विभागाला बिनशेती दस्त, गाैण खनिज, स्वामित्वधन, अनधिकृत बांधकामावरील दंड, अनधिकृत गाैण खनिज उत्खनन दंड, शासकीय जमिनीवरील अतिक्रमणामुळे होणारा दंड यातून १११ कोटींची (९२ टक्के) वसुली झाली असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. चक्रीवादळात नुकसान झालेल्या शाळांच्या दुरुस्ती आणि नवीन शाळांसाठी १ कोटीचा निधी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पूजार यांच्याकडे वर्ग करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. यावर्षी जिल्हा वार्षिक योजनेचा निधी १०० टक्के खर्च करण्यात रत्नागिरी जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर आहे; तसेच सलोखा योजनेअंतर्गत सर्वाधिक ४० शेतकऱ्यांनी अदलाबदल प्रक्रिया केली आहे; तसेच बिनशेती प्रकरणेही सर्वाधिक ४१,४३६ एवढी झाली आहेत. जिल्ह्यातील गावठाणांची निश्चिती करण्यात आली असून, १५३८ पैकी ३९५ मोजणी झाली आहे. यावेळी त्यांनी पाणीटंचाईचाही आढावा घेतला. यावर्षी कृती आराखडा निम्म्यावर म्हणजे पावणेसहा कोटींवर आला असल्याचे त्यांनी सांगितले. गाव तेथे स्मशानभूमी – दफनभूमी योजनेअंतर्गत १५३८ गावांमध्ये १९३५ ची नोंद अधिकार लेखात झाली आहे. अजूनही मोजणीची प्रक्रिया सुरू असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.