
जिल्ह्याच्या दहा नद्यांमधून ५ लाख घनमीटर गाळ उपसा
रत्नागिरी :जिल्हा प्रशासनाने १ एप्रिल २०२२ ते ३१ मार्च २०२३ या कालावधीत १० नद्यांमधील गाळ काढण्याची कामे सुरू केली आहेत. आतापर्यंत या नद्यांमधील ५ लाख १४ हजार ९१२ घनमीटर इतका गाळ काढण्यात आला आहे, तर चिपळूण येथील वाशिष्ठी नदीतून गेल्या दोन वर्षांत १२.२४ लक्ष घनमीटर इतका गाळ काढण्यात आला आहे. कामे सुरू असलेल्या नद्यांमधील गाळ काढण्यासाठी दीड कोटींचा निधी जिल्हा प्रशासनाकडून वितरित करण्यात आला आहे.
चिपळुणातील वाशिष्ठी नदीतील गाळामुळे २०२१ साली शहरात महापुर आला होता. त्यामुळे २१-२२ आणि २२-२३ या दोन वर्षांच्या कालावधीत चिपळुणात नाम फाउंडेशनच्या माध्यमातून गाळ काढण्याचे काम सुरू आहे. या नदीतून पहिल्या वर्षी ८.१० लक्ष घनमीटर इतका गाळ काढण्यात आला, तर दुसऱ्या वर्षी ४.१४ लक्ष घनमीटर इतका गाळ काढण्यात आला. यासाठी ९ कोटी ५७ लाख इतका खर्च झाला. त्यापैकी राज्य शासनाने ९ कोटी २२ लाख दिले, तर उर्वरित ३५ लाखांचा निधी सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेतून देण्यात आला. जिल्ह्यातील १० नद्यांमधील गाळ काढण्याच्या कामाला गेल्या वर्षीपासून सुरुवात झाली आहे. या सर्व नद्यांमधील गाळ काढण्यासाठी ३ कोटी ७ लाख ८६ हजार इतका खर्च अपेक्षित आहे. त्यापैकी जिल्हा वार्षिक योजनेतून १ काेटी ८७ लाख इतक्या निधीला प्रशासकीय मान्यता मिळाली असून, १ कोटी ५० लाख ५९ हजार इतका निधी यंत्रणांकडे वितरित करण्यात आला आहे. आतापर्यंत देवडे, राजापूर, मिरजोळे, पोमेंडी खुर्द (ता.रत्नागिरी), शास्त्रीपूल, चिपळूण येथील काजळी, कोदवली, गाैतमी नदी, शास्त्री, वाशिष्ठी आदी दहा ठिकाणांच्या नद्यांमधील ५.१५ घनमीटर इतका गाळ काढण्यात आला आहे. सध्या हे काम सुरू आहे. यापैकी मिरजोळे, पाेमेंडीखुर्द, पावस, मजगाव आणि वाशिष्ठी नदीतील गाळ नाम फाउंडेशनच्या माध्यमातून काढण्यात आला आहे. उर्वरित नद्यांमधील गाळ काढण्याचे काम अलोरे येथील यांत्रिकी विभागाकडून सुरू आहे.