
‘डीजीटल टेलीमेटर’द्वारे भूजल पातळी एका क्लिकवर
भूजलकडून प्रयोग ; जिल्ह्यात नऊ ठिकाणी संयंत्राद्वारे लक्ष
रत्नागिरी, ः भूजल पातळी तंतोतंत माहिती मिळावी आणि त्याद्वारे पाणीटंचाईचे चित्र स्पष्ट होऊ शकेल यासाठी भूजल विभागाकडून निरीक्षण विहिरींवर स्वयंचलित संयंत्र बसविण्यात आली आहेत. राज्यात ३३६ तर रत्नागिरी जिल्ह्यात नऊ ठिकाणी डीजीटल टेलीमेटर यंत्र बसवले आहे. त्यामुळे प्रत्यक्ष विहिरींच्या ठिकाणी न जाता एका क्लिकवर चोविस तास कधीही माहिती मिळवणे सोपे होणार आहे. हा प्रयोग यशस्वी झाला असून लवकरच त्याची अंमलबजावणी राज्यभरात केली जाणार आहे.
राज्याच्या भूजल संपत्तीचे संवर्धन आणि संरक्षण करण्यासाठी राष्ट्रीय जलविज्ञान प्रकल्प राज्यभरात राबविण्यात येत आहे. यामध्ये आधुनिक तंत्राचा उपयोग करुन माहिती संकलनावर भर दिला आहे. यासाठी भूजल आयुक्त चिंतामणी जोशी यांनी पाऊल उचलले आहे. त्यांनी राबविलेल्या या प्रकल्पामधील उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांचा जागतिक बँकेने हैद्राबादमध्ये सन्मान केला.
भूजल विभागाकडून निरीक्षण विहीरींमधील पाणी पातळी प्रत्यक्ष जागेवर जाऊन तपासली जात होती. त्याची माहिती जिल्ह्यातून राज्यस्तरावर पाठविली जात होती. पातळी तपासण्यासाठी टेपचा वापर केला जात होता. निरीक्षण विहिरी या ग्रामीण भागामध्ये दऱ्याखोऱ्यात असल्याने कर्मचाऱ्यांची गैरसोय होत होती. वर्षातून चार वेळा पातळी मोजावी लागते. तसेच तंतोतंत माहिती मिळणेही अशक्य होत असे. यासाठी सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेद्वारे राज्यातील ३३६ निरीक्षण विहिरींमध्ये स्वयंचलित संयंत्र गतवर्षी बसविण्यात आली आहेत. राज्यात ३० हजार विहिरी तर जिल्ह्यात अशा ६० विहिरी आहेत. नवीन यंत्रामुळे एसएमएसद्वारे माहिती कार्यालयात बसून मिळत आहे. तीही तंतोतंत असून त्यामधून योग्य अंदाज बांधणेही शक्य झाले आहे. तसेच पाहिजे तेव्हा ही नोंद घेणे शक्य होत आहे. हा प्रयोग यशस्वी झाला असून सर्व विहिरींवर ही यंत्रणा बसवण्यात येणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यात म्हाप्रळ, दाभोळ, देवरुख, खेडशी, लांजा, कोंढये तर्फे सौंदळ, गुहागर, कापसाळ, आस्तान या ठिकाणी अत्याधुनिक संयत्र बसवण्यात आले आहे.