
जिल्ह्यात ९ ठिकाणी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना
मोफत आरोग्य सुविधा ; उपचारासह तपासण्याही होणार
रत्नागिरी:- नागरिकांना आरोग्याच्या मुलभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी शासनाने ‘हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ योजना सुरू केली आहे. गोरगरीब, झोपडपट्टी भागात राहणाऱ्या नागरिकांसाठी वेळेवर व भक्कम आरोग्य सुविधा मिळाव्यात हा एकच ध्यास घेवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली होती. महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून रत्नागिरी जिल्ह्यात ९ दवाखाने सुरू करण्यात आले आहेत.
सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत नागरी आरोग्यवर्धिनी आरोग्य केंद्रे १५ व्या वित्त आयोग अंतर्गत स्थापित केली जाणार आहेत. राज्यात १५ व्या वित्त आयोगांतर्गत मंजूर नागरी आरोग्यवर्धिनी केंद्राचे रुपांतर ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ केंद्रात करण्यात येत आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात सर्व तालुक्यांमध्ये १ मे रोजी सुरु करण्यात आले आहेत, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी सांगितले. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात एक अशा ९ ठिकाणी ‘आपला दवाखाना’ सुरू झाला आहे. या दवाखान्याची वेळ दुपारी २ ते रात्री १० वाजेपर्यंत असून सर्व आरोग्य सुविधा मोफत उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. या दवाखान्यात देण्यात येणाऱ्या मोफत आरोग्य सेवांचा लाभ घेण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले-गावडे यांनी केले आहे. या योजनेद्वारे मोफत वैद्यकीय तपासणी, औषधोपचार, किरकोळ जखमांवर मलमपट्टी यासह रक्त चाचण्यांची सेवा मोफत उपलब्ध करून दिली जाणार आहे. याशिवाय क्ष-किरण (एक्स-रे), सोनोग्राफी इत्यादी चाचण्याकरिता पॅनलवरील डायग्नोस्टिक केंद्राद्वारे स्वस्त दरात संबंधित वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. विशेष तज्ञांच्या सेवा देखील उपलब्ध होतील. ह्यात ओपीडी स्वरूपात सेवा देण्यात येणार आहे. या दवाखान्यात बाह्य रुग्णसेवा, मोफत औषधोपचार, मोफत प्रयोगशाळा तपासणी, टेली कन्सल्टेशन, गर्भवती मातांची तपासणी, लसीकरण या सेवा देण्यात येणार असल्याची माहिती डॉ. आठल्ये यांनी दिली.