
रत्नागिरीत महाराष्ट्र दिनी सहा जणांचे लाक्षणिक उपोषण
रत्नागिरी, ः महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून सोमवारी (ता. १) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी अनेकांनी उपोषणे केले. लांजा-झापडे कांटे-कोटमार्गे पावस रस्त्यावरील बेनी मार्गावर त्वरित पूल मंजूर करावा, या मागणीसाठी शांताराम उर्फ आबा सुर्वे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर उपोषण केले.
काळबादेवी येथील अनधिकृत बांधकाम तोडण्यासंदर्भात तसेच उपविभागीय अधिकारी यांनी दिलेल्या आदेशाची तहसीलदारांनी पायमल्ली केल्याची तक्रार करत काळबादेवी येथील शैलेंद्र मयेकर यांनी उपोषण केले. खेड येथील जयंत घोसाळकर यांनी वडिलांचा संशयास्पद मृत्यूचा तपास, डंपर अंगावर घालणाऱ्यावर कारवाई करा आणि अन्य काही मागण्यांसाठी आंदोलन छेडले. राजापुरातील रस्त्यांच्या साईडपट्टीवर गटार लाईनवर महानेट प्रकल्पाच्या कंपनी आणि ठेकेदारांनी चुकीच्या पद्धतीने खांब टाकले आहेत. हे खांब काढून टाकावेत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता समीर शिरवडकर यांनी करत उपोषण केले. या आंदोलनात पिंट्या कोठारकर आणि स्वाती हडकर यांनी सहभाग घेतला. कुडप ग्रामपंचायत आणि बांधकाम विभाग चिपळूण यांच्यामार्फत बनवण्यात आलेल्या बिबिवीचा कातळ ते देवशेत वाडी या नावाचा रस्ता कुठलेही शासकीय पुरावे न दिल्यामुळे या अनधिकृत रस्त्याला कायमस्वरूपी स्थगिती व ग्रामपंचायतीमध्ये २६ नंबरची बेकायदेशीर असलेली रस्त्याची नोंद रद्द न केल्यामुळे कुडप येथील नितीश शिर्के यांनी उपोषण केले.
लांजा तालुक्यातील पश्चिम विभागासाठी हा पूल झाल्यास बाराही महिने दळणवळणाची सोय होणार आहे. त्यामुळे हा पूल मंजूर करावा, अशी मागणी आबा सुर्वे यांनी केली. या वेळी राजापूर-लांजा तालुका संघाचे अध्यक्ष सुभाष लाड, सरपंच विनया कुष्टे, अभिजित राजाध्यक्ष, गोविंद गोखले, महेश करंबळे, मोहन डिके, मिलिंद कोटकर उपस्थित होते.


