
सरपंच फय्याज मुकादम यांच्या प्रयत्नाने मजगाव गावाच्या विकासाकरिता कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर
पालकमंत्री ना.उदय सामंत यांच्या माध्यमातून विकास निधिला मान्यता
रत्नागिरी :महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री व पालकमंत्री ना.उदय सामंत यांच्या रोजगार कार्यालयाचे प्रतिनिधी, रत्नागिरी तालुक्यातील मजगाव ग्रामपंचायतीचे सरपंच फय्याज मुकादम यांच्या प्रयत्नातून मजगाव गावाला कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. उद्योग मंत्री व पालकमंत्री ना.उदय सामंत व सिंधुरत्न समृद्ध योजनेच्या कार्यकारी समितीचे संचालक, उद्योजक किरण सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली फय्याज मुकादम संपूर्ण जिल्हा परिषद गटात शिवसेना पक्षाचे काम करत आहेत. फय्याज मुकादम यांच्या प्रयत्नातून तीन ठिकाणी खाडी किनारी संरक्षक भिंत उभारणी करण्याकरिता सुमारे साडेतीन कोटी रुपये, दोन रस्त्यांच्या डांबरीकरण कामासाठी सुमारे २० लाख रुपये, जलजीवन मिशन अंतर्गत नवीन नळ पाणी योजनेसाठी सुमारे ९५ लाख रुपये, शाळा दुरुस्ती करिता निधी, मच्छीमार ओटे, मजगाव नदीतील गाळ उपसा करण्यासाठी निधी असे एकूण सुमारे सहा कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. फय्याज मुकादम यांच्या मिरजोळे जिल्हा परिषद गटासहित तालुक्यात जनसंपर्क चांगला असून अल्पसंख्यांक समाजातील अनेक प्रश्न ते हाताळत असतात. तसेच ना. उदय सामंत यांच्या अल्पसंख्यांक निधीच्या कामाचा आराखडा तयार करणे, खारभुमी खात्यामध्ये समन्व्यक म्हणून काम करणे ही जबाबदारी पार पाडत आहेत. त्यांच्या या सर्व भूमिकेमुळे महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आणि मजगांव वासियांशी असलेल्या अतूट संबंध या कारणाने गाव विकासासाठी निधी दिला आहे. मजगाव गावातील ग्रामस्थांमधून ना. उदयजी सामंत आणि सरपंच फैयाज मुकादम यांचे धन्यवाद मानण्यात येत आहेत.