
जिल्हा रुग्णालयातील 40 रुग्णवाहिकांसाठी केवळ 17 चालक, रुग्णांचे होताहेत हाल
पालकमंत्री लक्ष घालतील का?
रत्नागिरी :रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात 40 रुग्णवाहिकांसाठी सतराच चालक असल्याने रुग्णांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. तासनतास वाट पहात रहावे लागत आहे, त्यामुळे रुग्णांची हेळसांड होत आहे. परिणामी सर्वसामान्यांना न परवडणाऱ्या खासगी रुग्णवाहिकांचा आधार घ्यावा लागत आहे. त्यासाठी त्याच्या खिशाला चाट बसतो.
जिल्हा शासकीय रुग्णालय हे सर्वसामान्यांचा मोठा आधार आहे. सामान्य नागरिकांपासून ते उच्चभ्रू वर्गासाठीही मोफत आरोग्यसेवा देणारे मोठे केंद्र आहे; मात्र सध्या आरोग्यसेवा पुरवणाऱ्या या केंद्राची परिस्थिती अतिशय वाईट आहे. सर्व विभाग असूनही रिक्त पदांमुळे आरोग्यसेवेचे तीनतेरा वाजले आहेत. त्यात भरीस भर म्हणून आता रुग्णवाहिकेवरील चालकांच्या रिक्त पदांचा विषय ऐरणीवर आला आहे. गावागावातून तसेच शहरातील लोकांना मोफत किंवा अत्यल्प दरात सेवा पुरवण्याचे काम रुग्णालयातील कर्मचारी करतात.
जिल्हा शासकीय रुग्णालयात सध्या ४० रुग्णवाहिका उपलब्ध आहेत; परंतु रुग्णवाहिकांची सेवा पुरवण्यासाठी फक्त १७ वाहनचालक उपलब्ध आहेत. या वाहनचालकांना या रुग्णवाहिका चालवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. यापैकी काही रुग्णवाहिका तर अनेक दिवस चालवल्या न गेल्याने रुग्णालयातच धूळखात पडल्या आहेत. आता तर सर्वसामान्य नागरिकांनाही जिल्हा शासकीय रुग्णालयातून मिळणाऱ्या सुविधांची वाट न पाहता प्रसंगी पदरमोड करून खासगी रुग्णवाहिकांचा वापर करावा लागत आहे.
रुग्णाच्या सेवेत तत्पर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या १०८ या रुग्णवाहिकेसाठीही जिल्हा शासकीय रुग्णालयाकडे पुरेसा कर्मचारीवर्गच नाही. सध्या उपलब्ध असलेल्या १७ पैकी १६ वाहनचालक कंत्राटी कर्मचारी आहेत. रुग्णालयाचा कर्मचारी म्हणून एकच वाहनचालक सध्या उपलब्ध आहे. राज्याच्या आरोग्य विभागाकडूनही हे कर्मचारी नियुक्त करण्याबाबत कोणतीच कार्यवाही केली जात नसल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे रुग्णालयातील रुग्णवाहिकांची सेवा आता गॅसवर आहे. पालकमंत्री उदय सामंत यामध्ये लक्ष घालून हा प्रश्न मार्गी लावणार का? असे सर्वसामान्यांना वाटत आहे.