
जिल्ह्यात कोरोनाचे पुनरागमन; सतर्कता बाळगण्याचे प्रशासनाकडून आवाहन
रत्नागिरी :राज्यात व देशात कोरोनाची रुग्णसंख्या फेब्रुवारी २०२३ पासून वाढत आहे. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रामध्ये कोविड रुग्णांमध्ये वेगाने वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व स्तरावर सतर्कता बाळगणे आणि पूर्वतयारी करणे आवश्यक आहे. यासाठी जिल्हा टास्कफोर्स सभा जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच झाली. गेल्या काही दिवसात २४ बाधित सापडले आहेत.
काल झालेल्या बैठकीमध्ये जिल्हा टास्कफोर्स सभेमध्ये राज्यातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येबाबत चर्चा करण्यात आली. या वेळी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पूजार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले-गावडे उपस्थित होते तसेच जिह्यातील सर्व वैद्यकीय अधीक्षक, तालुका आरोग्य अधिकारी हे ऑनलाईन व्हीसीद्वारे उपस्थित होते.
राज्यासह देशभरात कोरोना संसर्गाचा फैलाव पुन्हा एकदा वाढू लागला आहे. कोरोनाच्या एक्सबीबी १.१६ व्हेरींटचा संसर्ग पसरला तर चिंता वाढवू शकतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. आधीच्या व्हेरिएंटचा प्रादुर्भाव तीन ते चार दिवसांतील उपचाराने कमी व्हायचा; परंतु या संसर्गाचा प्रादुर्भाव सात ते आठ दिवसांपर्यंत राहतो. त्यामुळे गाफील राहू नका, आतापासूनच काळजी घ्या, असा सल्लाही तज्ञांनी दिला आहे. पहिल्या दोन्ही लाटांतील रुग्णवाढीने चिंताजनक परिस्थिती निर्माण केली होती. उन्हाळ्याच्या दिवसांत कोरोना अधिक सक्रिय होऊन संसर्गजन्य ठरतो. या मागील तीन वर्षाच्या अनुभवावरून यंदाच्या उन्हाळ्यात कोरोना प्रतिबंधासाठी आरोग्य विभागाने कंबर कसली आहे. दरम्यान, मोठ्या प्रमाणावर कोरोना प्रतिबंधक लसीकरण झालेले असल्याने रुग्णवाढीचा आलेख पहिल्या दोन्ही लाटांच्या तुलनेत कमी राहील, असा आरोग्यतज्ज्ञांचा अंदाज आहे; मात्र इतर आजार असलेल्यांसाठी नवा व्हेरिएंट धोकादायक ठरू शकतो. इतरांनी देखील निष्काळजीपणा सोडून काळजी घेणे आवश्यक आहे.