अभ्यंकर- कुळकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाच्याएनएसएस स्वयंसेवकांकडून भात लावणी
रत्नागिरी : अभ्यंकर- कुळकर्णी कनिष्ठ महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या ४० स्वयंसेवकांनी कोळंबे गावातील ओझरवाडी येथे प्रत्यक्ष शेतामध्ये उतरून भात लावणी करत श्रमसंस्कार आणि कृषीसंस्कृतीचा अनोखा अनुभव घेतला.
या वेळी ओझरवाडी येथील शेतकरी घनश्याम फडके यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत करून भातशेतीचे महत्त्व, कोकणातील भात लागवडीची पारंपरिक पद्धत, रोपांची निवड, लागवड करणे, पाण्याचे नियोजन, तसेच शेतीतील आधुनिक तंत्रज्ञान याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांसमोर प्रत्यक्ष भात लावणीचे प्रात्यक्षिक करून दाखवले. त्यानंतर स्वयंसेवकांनी भात लावणी केली. चिखलात काम करताना विद्यार्थ्यांनी श्रमाचे महत्त्व अनुभवले. सुरुवातीला नवीन वाटणारे काम काही वेळातच विद्यार्थ्यांनी आनंदाने आत्मसात केले. पारंपरिक शेतीपद्धतीचा अनुभव घेताना विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. या उपक्रमामुळे शेती ही केवळ व्यवसाय नसून भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग असल्याची जाणीव विद्यार्थ्यांना झाली.

राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी अभिजीत भिडे यांनी विद्यार्थ्यांना श्रमसंस्कार, सामाजिक जबाबदारी आणि ग्रामीण विकासामध्ये युवकांची भूमिका याविषयी मार्गदर्शन केले. सहकार्यक्रमाधिकारी निलेश जोशी, सौ. मनस्वी लांजेकर आणि सौ. सारिका माळी यांनी भात लावणीत सहभाग घेतला. हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर व उपप्राचार्य प्रा.सुनील गोसावी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.