महाराष्ट्र राज्याच्या 67 वा स्थापना दिनपालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते शुक्रवारी शासकीय ध्वजवंदन सोहळा
रत्नागिरी, : महाराष्ट्र राज्याच्या 67 व्या स्थापना दिनानिमित्त शुक्रवार 1 मे रोजी सकाळी 8 वाजता पोलीस परेड ग्राऊंड येथे पालकमंत्री डॉ. उदय स्वरुपा रविंद्र सामंत यांच्या हस्ते ध्वजवंदन होणार आहे. तरी या प्रसंगी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात येथे आज जिल्हाधिकारी श्री. जिंदल यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र दिन नियोजनाबाबत बैठक झाली. यावेळी अपर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड, उपजिल्हाधिकारी (सा.प्र) विश्वजीत गाताडे, कार्यकारी अभियंता अमोल ओटवणेकर, प्रांताधिकारी जीवन देसाई आदींसह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
निवासी उपजिल्हाधिकारी श्री. सूर्यवंशी यांनी महाराष्ट्र दिन कार्यक्रम नियोजनाबाबत २३ एप्रील २०२६ च्या शासन निर्णयानुसार करावयाच्या कार्यवाहीबाबत माहिती दिली. नगरपालिकेने पाण्याची व्यवस्था, जिल्हा शासकीय रुग्णालयाने रुग्णवाहिका, क्रीडा विभागाने साऊंड सिस्टीमची व्यवस्था करावी. एमएसइबीने कार्यक्रमस्थळी वीज जाणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशा सूचना केल्या.
जिल्हाधिकारी श्री. जिंदल म्हणाले, मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम पोलीस परेड ग्राऊंड येथे 8 वाजता होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील इतर कार्यालयाने अथवा संस्थेने या दिवशी सकाळी 7.15 ते 9 वा. च्या दरम्यान ध्वजवंदनाचा किंवा इतर कोणताही शासकीय किंवा अर्धशासकीय समारंभ आयोजित करण्यात येऊ नये. जर एखाद्या कार्यालयास अथवा संस्थेला आपला स्वत:चा ध्वजवंदन समारंभ आयोजित करायचा असल्यास त्यांनी तो सकाळी 7.15च्या पूर्वी किंवा सकाळी 9 च्या नंतर आयोजित करावा.
सावधान स्थितीत येऊन वंदे मातरम् गीत म्हणण्यात यावे/वाजविण्यात यावे. तद्नंतर राष्ट्रध्वजाला वंदन करताना राष्ट्रगीत म्हणण्यात यावे/वाजविण्यात यावे व त्यानंतर लगेचच सावधान स्थितीत येऊन राज्यगीत वाजविण्यात यावे. याबाबतच्या सूचना ग्रामीण स्तरावर, शाळा, महाविद्यालयांमध्ये संबंधित विभागाने पोहचवाव्यात. या सर्व सूचनांचे तंतोतंत पालन होईल, याची दक्षता सर्वांनी घ्यावी, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या.