महिला आरक्षण विधेयकाला विरोध करणाऱ्यांचा रत्नागिरीत शिवसेनेकडून निषेध
रत्नागिरी: संसदेत महिलांना ३३ टक्के आरक्षण देणारे विधेयक काँग्रेससह विरोधी पक्षांच्या आडमुठ्या धोरणामुळे फेटाळले गेल्याने रत्नागिरीत संतापाचा उद्रेक पाहायला मिळाला. महिलांच्या हक्कावर गदा आणणाऱ्या या कृत्याचा निषेध करण्यासाठी रत्नागिरी शहर शिवसेना महिला आघाडीने शनिवारी, १८ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता जयस्तंभ येथे ‘एल्गार’ पुकारला. रणरागिणींच्या घोषणांनी जयस्तंभ परिसर दणाणून सोडत शिवसेनेने विरोधकांविरुद्ध जोरदार निदर्शने केली.
या आंदोलनाचे नेतृत्व नगराध्यक्षा सौ. शिल्पा सुर्वे यांनी केले. यावेळी बोलताना त्यांनी विरोधकांवर बोचरी टीका केली. “स्त्रीशक्तीचा सन्मान करण्याऐवजी राजकारण आडवे आणून महिलांच्या प्रगतीचा मार्ग रोखणाऱ्या विरोधकांचा चेहरा आता उघडा पडला आहे,” अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला. महिलांना कायदेशीर अधिकार देणारे हे विधेयक लोकशाहीसाठी गरजेचे असतानाही केवळ राजकीय वैमनस्यातून ते पाडण्यात आले, असा आरोपही यावेळी करण्यात आला.
भर पावसात किंवा उन्हाची तमा न बाळगता जमलेल्या महिला कार्यकर्त्यांनी हातात फलक घेऊन विरोधकांच्या भूमिकेचा निषेध केला. या आंदोलनात नगरसेविका पूजा पवार, श्रद्धा हळदणकर, मेधा कुलकर्णी, प्रीती सुर्वे आणि जागृती पिलणकर यांच्यासह शिवसेनेच्या अनेक महिला पदाधिकारी व कार्यकर्त्या मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
महिला शक्तीला डावलणे विरोधकांना महागात पडेल, असा इशारा देत शिवसेनेने हे आंदोलन अधिक तीव्र केले. जयस्तंभ चौकातील या आंदोलनाने शहरवासियांचे लक्ष वेधून घेतले होते. आगामी काळात महिला आरक्षणाचा हा मुद्दा अधिक तापण्याची चिन्हे असून, शिवसेनेने या आंदोलनाद्वारे विरोधकांना सडेतोड उत्तर दिले आहे. शेवटी घोषणाबाजी करून या निषेध सभेची सांगता करण्यात आली.