हातखंबा येथे आंब्याने भरलेला ट्रक पलटी; चालक सुखरूप
रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा-तिठा परिसरात आज (२२ मार्च) पहाटे आंब्याने भरलेला ट्रक पलटी झाल्याची घटना घडली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी अथवा दुखापत झाली नाही. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
मिळालेल्या माहितीनुसार, २२ मार्च रोजी सकाळी सुमारे ६.१५ वाजण्याच्या सुमारास हातखंबा तिठा परिसरातील वळणावर ट्रक (क्र. एमएच ०८ एपी ५०७९) हा अचानक एका बाजूला झुकून पलटी झाला. हा ट्रक चालक कैलास निचल (वय ४५, रा. गायाळवाडी, ता. जि. रत्नागिरी) हे रत्नागिरीहून अहमदाबादकडे आंब्याच्या पेट्या घेऊन जात होते. हातखंबा तिठामधील वळण घेत असताना वाहनाचा तोल गेल्याने ट्रक रस्त्याच्या कडेला कलंडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
या अपघातानंतर ट्रकमधील आंब्याच्या पेट्या तातडीने दुसऱ्या वाहनात हलविण्याचे काम सुरू करण्यात आले. तसेच क्रेनच्या सहाय्याने पलटी झालेला ट्रक बाजूला करण्याची कार्यवाही करण्यात आली.
अपघाताची माहिती मिळताच हातखंबा पोलीस मदत केंद्र तसेच ग्रामीण पोलीस ठाण्याचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्या देखरेखीखाली मदतकार्य सुरू होते. तसेच दुसऱ्या बाजूने महामार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू होती. याबाबत पुढील तपास ग्रामीण पोलीस करीत आहे.