रत्नागिरी-देवगड हापूसचा केवळ १० टक्केच हंगाम हाताशी
रत्नागिरी: आंबा हंगामात यंदा देवगड, रत्नागिरी हापूस चांगलाच भाव खाणार अशी स्थिती आहे. वातावरणातील बदलांमुळे कोकणातीला आंबा बागांत मोठ्या प्रमाणात मोहोर व फळगळती झाली आहे. त्यामुळे केवळ दहा टक्केच आंबा हाती लागेल असे कोकणातील आंबा उत्पादक शेतकर्यांमधून सांगितले जात आहे. या स्थितीमुळे येथील शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. एप्रिल महिन्यातच आंब्याची आवक बाजारात वाढणार आहे. उत्पादन घटल्याने आंब्याचे दर चढेच राहणार आहेत.
कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातून रत्नागिरी हापूस आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातून देवगड हापूस प्रतिवर्षी मोठ्या प्रमाणात बाजारात येतो. यंदाच्या हंगामात नोव्हेंबर महिन्यात कोकणातील आंबा बागांना मोठ्या प्रमाणात मोहोर आला. झाडांच्या पानांपेक्षा मोहोरच अधिक प्रमाणात होता. त्यामुळे चांगले उत्पादन मिळेल अशी परिस्थिती होती; मात्र मध्यंतरी झालेले ढगाळ वातावरण, कडाक्याची थंडी, अवकाळी पाऊस आणि आता अचानक वाढलेली उन्हाची तीव-ता यामुळे मोहोर करपला, तर धरलेली फळे गळून पडली. यामुळे आंब्याची आवक फार कमी प्रमाणात होणार आहे.
आंबा झाडाला तीन टप्प्यांत मोहोर
कोकणातील आंबा झाडांना तीन टप्प्यांत मोहोर येतो. पहिला मोहोर नोव्हेंबर महिन्यात येतो. दुसरा जानेवारीदरम्यान, तर तिसर्या टप्प्यातील मोहोर फेब्रुवारीत येतो. पहिल्या आणि दुसर्या टप्प्यात आलेला मोहोर 70 ते 80 टक्के करपून गेला. यामधून शिल्लक राहिलेल्या मोहोरामधून फळधारणा झाली; पण ती फळेही आता वाढलेल्या उष्णतेमुळे गळून पडत आहेत. आता फेब्रुवारीमध्ये आलेल्या मोहोरामधूनच पुढील काळात नैसर्गिक आपत्ती आली नाही, तरच आंबा थोड्याफार प्रमाणात शेतकर्यांच्या हाती लागणार आहे.
शेतकरी आर्थिक अडचणीत
आंबा कलमांची जोपासना, कलमांचा विमा, मजुरांची मजुरी हा वार्षिक खर्च आहेच. सध्या हवामानातील बदलामुळे मोहोर करपू लागल्याने शेतकर्यांनी आतापर्यंत चार ते पाच वेळा कीटकनाशकांची फवारणी केली आहे. वार्षिक खर्च लाखांच्या घरात आहे. खर्चाच्या तुलनेत उत्पादन कमी मिळण्याची शक्यता आहे. कीटकनाशक, खरेदीचे पैसे भागवणेही मुश्कील झाले असल्याने कोकणातील आंबा उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.