बांधकाम व्यावसायिकांच्या महत्वाच्या समस्या आचारसंहितेनंतर दूर होतील – आ. किरण सामंत
रत्नागिरी
बांधकाम व्यावसायिकांना हवाई परवानग्या घेताना अडचणी येतात. याशिवाय प्रादेशिक योजना असतील किंवा जिल्ह्यात ग्रोथ सेंटर उभारताना येणाऱ्या अडचणी असतील. जिल्हा परिषद निवडणुकीची आचारसहिता संपताच त्या त्या विभागामार्फत या अडचणी सोडवण्यासाठी बैठका घेतल्या जातील अशी माहिती आमदार किरण सामंत यांनी दिली. क्रेडाई आयोजित वास्तूरंग प्रदर्शनाच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते.
क्रेडाई आयोजित वास्तूरंग प्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवारी आमदार किरण सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांच्या सोबत क्रेडाई अध्यक्ष महेश गुंदेचा, नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे, राजापूरच्या नगराध्यक्ष हुस्नबानू खलीपे, भाजपच्या महिला जिल्हाध्यक्ष वर्षा ढेकणे, सहाय्यक नगररचनाकार विराज बोडस, नगरसेवक सौरभ मलुष्टे, नगरसेविका पूजा पवार, नगरसेविका रूखसार खान, नगरसेविका फौजिया खान आदी उपस्थित होते.
1999 मध्ये क्रीडाईची स्थापना झाली. त्या काळात बिल्डर वर्गाबाबत तितका विश्वास नव्हता. मात्र हा विश्वास क्रेडाईने मिळवून दिला. सद्यस्थितीत बिल्डर वर्गाच्या काही अडचणी प्रलंबित आहेत. यात हवाई परवानग्या घेताना खूप अडचण येते. या परवानग्या घेण्यासाठी दिल्लीला फेऱ्या माराव्या लागतात. सध्या महायुतीतील मुरलीधर मोहोळ या खात्याचे मंत्री आहेत. जिल्हा परिषदेची आचारसंहिता संपताच त्यांच्यासोबत बैठक लावून हा प्रश्न निकाली काढू असा विश्वास आमदार किरण सामंत यांनी यावेळी दिला. सीआरझेड प्रश्न सोडवण्यात शासनाला यश आले आहे. आता प्रादेशिक योजनाबाबत निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत. आचारसंहिता संपताच हा प्रश्न देखील सोडवला जाईल असे ते म्हणाले. एमएसआरडिसी मार्फत जिल्ह्यात 12 ग्रोथ सेंटर्स उभारली जात आहेत. यानंतर जिल्ह्याचा विकास मोठ्या प्रमाणावर होणार आहे. ग्रोथ सेंटर्स उभारण्यातही काही तांत्रिक अडचणी आहेत. या खात्याचे मंत्री एकनाथ शिंदे आहेत. त्यांच्या सोबत एमएसआरडिसी आणि टाऊन प्लॅनिंग विभागाची एकत्र बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावू असे आमदार किरण सामंत यांनी सांगितले.
उद्योगमंत्री ना. उदय सामंत यांनी दावोस येथून मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक कोकणात आणली आहे. यांच्यासह होणारे औद्योगीकरण आणि वाढणारे पर्यटन लक्षात घेता जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक शक्य आहे. येणार काळ हा बांधकाम क्षेत्रासाठी भरभराटीचा असेल असे मत यावेळी आमदार किरण सामंत यांनी व्यक्त केले.