रत्नागिरी तालुक्यात जि प.साठी ३७ तर पंचायत समितीसाठी ५१ उमेदवार वैध
रत्नागिरी : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठीची रत्नागिरी तालुक्याची छाननी प्रक्रिया आज झाली. यामध्ये हातखंबा जिल्हा परिषद गटामध्ये दोन अर्ज बाद झाले. त्यामुळे तालुक्यात जिल्हा परिषदेच्या १० गटासाठी ३७ उमेदवार तर पंचायत समितीच्या २० गणासाठीच्या ५१ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहे. उमेदवारी अर्ज माघारीची अंतिम तारीख २७ जानेवारी आहे.
रत्नागिरी जिल्हा परिषदेसाठी ५६ गट असून, रत्नागिरी तालुक्यात जिल्हा परिषदेचे १० गट आहेत. यासाठी ३८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. आज झालेल्या छाननीमध्ये हातखंबा जिल्हा परिषद गटातून उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या जनार्दन रामचंद्र जाधव यांचा अर्ज बाद ठरवण्यात आला. ते राष्ट्रवादी अजितदादा पवार पक्षाकडून रिंगणात उतरले होते; मात्र त्यांच्या अर्जावर सूचक म्हणून सही केलेली व्यक्ती ही हातखंबाऐवजी अन्य गटामधील होती. त्यावर स्वाक्षरीही नव्हती. त्यामुळे अर्ज बाद करण्यात आला.
दुसरा अर्ज माजी समाजकल्याण सभापती पर्शुराम कदम यांचा बाद झाला. त्यांनी एकूण चार उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यातील एक अर्ज बाद झाला आहे. त्यामुळे २७ जानेवारीपर्यंत दोन अर्ज मागे घेऊन कदम निवडणुकीच्या रिंगणात राहणार आहेत. पंचायत समितीसाठी २० गणांमध्ये ५१ व्यक्तींनी उमेदवारी अर्ज दाखल केले असून, ते सर्व वैध ठरले आहेत. यातील कितीजण अर्ज मागे घेतात, याकडे लक्ष लागून राहिले आहे.