एकजूट दाखवत जिल्हा परिषद, पं. स. मध्ये मोठा विजय संपादन करूया – दीपक पटवर्धन
रत्नागिरी :
राज्यात नगर परिषद, महानगर पालिकांमध्ये भाजपा-शिवसेना युतीला मोठे यश मिळाले आहे. मागील काही वर्षात मोठी विकास कामे ग्रामीण भागात झाली असून, आता जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमध्ये सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र राहून मोठा विजय संपादन करुया असे आवाहन भाजपाचे जिल्हा निवडणूक संयोजक ॲड. दीपक पटवर्धन यांनी सांगितले.
मंगळवारी स्वयंवर मंगल कार्यालयात भाजपा-शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न झाला. यानंतर शिवसेना व भाजपाच्या उमेदवारांनी जि.प. व पं.स.साठी अर्ज दाखल केले. यापूर्वी झालेल्या मेळाव्याला ॲड. दीपक पटवर्धन यांच्यासह शिवसेना जिल्हाप्रमुख राहूल पंडीत, तालुकाप्रमुख बंड्या साळवी, महेश उर्फ बाबू म्हाप, भाजपा तालुकाध्यक्ष दादा दळी व प्रतिक देसाई आदी पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाप्रमुख राहूल पंडीत यांनी सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र राहून एकदिलाने काम करण्याचे आवाहन केले. याचवेळी नामनिर्देक्षण पत्र भरताना कोणत्याही त्रुटी राहू नयेत यासाठी सूचनाही केल्या. यानंतर मार्गदर्शन करताना ॲड. पटवर्धन यांनी दोन्ही पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. जिल्ह्याम्ाध्ये पालकमंत्री व राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली मोठी विकास कामे झालेली आहेत. ग्रामीण भागातही विकास कामांचा धडाका महायुतीच्या माध्यमातून सुरु आहे. झालेली विकास कामे जनतेपर्यंत घेऊन जाणे आवश्यक आहे. यासाठी दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी एकदिलाने काम करावे असे आवाहनही त्यांनी केले. हा मेळावा संपल्यानंतर शिवसेना व भाजपाच्या उमेदवारांनी आपले नामनिर्देक्षपत्र प्रांताधिकारी जीवन देसाई यांच्याकडे सुपुर्त केले. यावेळी युतीकडून शक्तीप्रदर्शनही करण्यात आले. ग्रामीण भागामधून मोठ्या संख्येने पदाधिकारी रत्नागिरीत दाखल झाले होते.