रत्नागिरी-कोल्हापूर आंबा घाटात नेपाळी ट्रॅव्हल्स दरीत कोसळली; ९५ प्रवासी सुखरूप!
रत्नागिरी: कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावरील धोकादायक आंबा घाटातील चकरी वळणावर आज पहाटे मोठी दुर्घटना होता होता टळली आहे. प्रवाशांना घेऊन जाणारी एक नेपाळी खासगी ट्रॅव्हल्स बस सुमारे ७० फूट खोल दरीत कोसळली. मात्र, सुदैवाने या भीषण अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. बसमध्ये अंदाजे ९५ प्रवासी होते, अशी माहिती मिळाली असून, जखमींना तातडीने उपचारासाठी हलवण्यात आले आहे.
हा अपघात आज, शुक्रवार (०५ डिसेंबर २०२५) रोजी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास घडला. दाट धुक्याची आणि तीव्र वळणांची ओळख असलेल्या आंबा घाटातील चकरी वळण या ठिकाणी चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि बस थेट खोल दरीत कोसळली.
अपघातग्रस्त बसमधील सर्व ९५ प्रवाशांना तातडीने स्थानिक नागरिकांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. सुदैवाने बहुतांश प्रवासी सुखरूप आहेत, मात्र काहींना किरकोळ दुखापत झाली आहे. प्रथमोपचारासाठी या जखमी प्रवाशांना नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्र, साखरपा येथे त्वरित हलविण्यात आले आहे.
अपघाताची माहिती मिळताच साखरपा पोलीस आणि स्थानिक प्रशासनाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी अपघातग्रस्त परिसराचा पंचनामा केला असून, बस दरीत कोसळण्यामागचे नेमके कारण काय होते याचा अधिक तपास सुरू आहे.
एका नेपाळी ट्रॅव्हल्सचा एवढा मोठा अपघात होऊनही कोणतीही जीवितहानी न झाल्यामुळे प्रवाशांनी आणि स्थानिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. आंबा घाटातील धोकादायक वळणांवर वाहन चालवताना अधिक दक्षता घेण्याची गरज या घटनेने पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे