उद्योग विभागाचा मुद्रांक शुल्काशी काहीही संबंध नाही – ना. सामंत
रत्नागिरी(वार्ताहर)
राज्यातील राजकीय वातावरण तापलेले असताना, उद्योग मंत्री उदय सामंत यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेत विविध विषयांवर सविस्तर स्पष्टीकरण दिले. विशेषतः मुद्रांक शुल्क सूट प्रकरणावर त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली आणि उद्योग विभागाकडून कोणतीही सूट देण्यात आलेली नाही, असा ठाम दावा केला.
ना. सामंत म्हणाले, उद्योग विभागाचा मुद्रांक शुल्काशी काहीही संबंध नाही. या प्रकरणात एमआयडीसी महा व्यवस्थापकाचे पत्र माझ्याकडे आहे आणि त्या पत्रानुसार पार्थ पवार यांना एकही रुपयाचा लाभ दिलेला नाही. काही ठिकाणी ‘21 कोटींच्या ऐवजी 500 रुपये घेतले’ असा दावा करण्यात आला, परंतु असे काहीही झालेले नाही. त्यांनी पुढे सांगितले की, मुद्रांक शुल्क सवलत देण्याचा अधिकार फक्त कॅबिनेट बैठकीला आहे, उद्योग विभागाकडे नाही. त्यामुळे या संदर्भात आम्ही सखोल चौकशी करू.
उद्धव ठाकरे आणि युती संदर्भात विधान
उद्धव ठाकरे यांच्यावर बोलताना सामंत म्हणाले, “कदाचित त्यांना संशय असेल, पण त्यांच्यातले अनेक लोक आमच्या संपर्कात आहेत. ज्यांना युती करायची आहे, त्यांनी थेट आमच्या पक्षात यावे आणि आमची निशाणी घ्यावी. रत्नागिरी जिल्ह्यातील राजकीय समीकरणांवर बोलताना त्यांनी सांगितले की, “आम्ही युती करायला तयार आहोत, पण योग्य वेळी निर्णय घेतला जाईल.”
जरांगे पाटील आणि सिंधुदुर्ग दौरा
मनुस्मृती रद्द आणि आरक्षणाच्या मागण्यांबाबत आंदोलन करणारे जरांगे पाटील यांच्या संदर्भात सामंत म्हणाले, त्यांच्या तक्रारींची योग्य ती दखल घेण्यात यावी, अशी माझी भूमिका आहे. तसेच त्यांनी जाहीर केले की, मी 8 नोव्हेंबरला सिंधुदुर्ग दौऱ्यावर जाणार असून, त्यानंतर युतीबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल.
महायुती आणि निवडणुका
आगामी नगरपालिकांच्या निवडणुका लक्षात घेऊन सामंत म्हणाले, राज्यातील नगरपालिकांच्या निवडणुकीत 200 पेक्षा जास्त नगराध्यक्ष महायुतीचे होतील, असा मला विश्वास आहे. तसेच गणेश नाईक यांच्यावरील प्रश्नावर त्यांनी स्पष्ट केले की, सध्या महानगरपालिकेच्या निवडणुका नाहीत. आम्ही सध्या नगरपालिका आणि नगरपंचायतींकडे लक्ष केंद्रित केले आहे. सध्या आमच्यासाठी तो विषय महत्त्वाचा नाही.