रत्नागिरीत रात्रीत ३ घरे फोडण्याचा प्रयत्न; नागरिकांमध्ये भीती
रत्नागिरी:
रत्नागिरी शहर परिसरामध्ये चोरटे सलग दुसऱ्या दिवशी देखील सक्रिय आहेत. बुधवारी रात्री साईनगर येथे चोरट्यांनी एका रात्रीत तीन बंद घरे फोडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे रत्नागिरीत चोरट्यांची दहशत निर्माण झाल्याचे चित्र आहे. चोरट्यांनी लक्ष केलेल्या तीन घरांमध्ये एका लोकप्रतिनिधीच्या जुन्या घराचा समावेश आहे. चोरट्यांनी कुदळीने कडी-कोयंडा उचकटून चोरीचा प्रयत्न केला; परंतु मौल्यवान वस्तू न गेल्यामुळे त्याची तक्रार केलेली नाही.
जिल्ह्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. राजापूर आणि खेडमध्ये घरफोड्या झाल्या होत्या. त्यानतंर रत्नागिरीतील छत्रपतीनगर येथे बंद बंगल्याची रेकी करून चोरट्यांनी तो फोडला. यामध्ये सुमारे १५ तोळे सोन्याचे दागिने आणि ४० हजार रोकड चोरट्यांनी लांबवली. एवढ्यावर हे चोरटे न थांबता सलग दुसऱ्या दिवशी चोरट्यांनी शहराजवळील साईनगर येथे तीन बंद घरे फोडली. रात्री सुमारे दीडच्या सुमारास चोरट्यांनी आयरे यांच्या जुन्या घराचे कुलूप कुदळीने उचकटून चोरी करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर चव्हाण आणि कांबळे यांचेही घर फोडण्याचा प्रयत्न केला. चोरट्यांचे धाडस म्हणजे एका घरचा दरवाजा देखील काढून टाकला आहे.
पाचारण श्वानपथकालाही करण्यात आले. मात्र, ते चोरट्यांचा माग काढू शकले नाहीत; परंतु या घटनेमुळे चोरटे अजून रत्नागिरी परिसरात सक्रिय असल्याचे स्पष्ट झाले आहे. एका रात्रीत झालेल्या या तीन घरफोड्यांमध्ये कोणती मौल्यवान वस्तू चोरीला गेलेली नाही. त्यामुळे कोणी तक्रार केलेली नाही. नागरिकांनी जागरूक राहून काही संशयास्पद आढळल्यास पोलिसांशी संपर्क करावा.