समृद्ध पंचायतराज अभियानात धामणसें ग्रामपंचायतीचा उत्स्फूर्त सहभाग
रत्नागिरी : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत धामणसे ग्रामपंचायतीची ग्रामसभा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. ग्रामसभेला महिला व ग्रामस्थ मिळून सुमारे २०० लोकांनी उत्स्फूर्त उपस्थिती लावली. ही सभा स्वर्गीय डी.एम . जोशी सभागृहात घेण्यात आली
ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच अमर रहाटे होते. उपसरपंच ऋतुजा उमेश कुळकर्णी, सदस्य अनंत जाधव, समीर सांबरे, संजय गोनबरे, दीपक रेवाळे, सिद्धी कानडे, वैष्णवी धनावडे, अनघा जाधव यांच्यासह महसूल अधिकारी सिद्धी शिवलकर, माजी सरपंच विलास पांचाळ, आंबा व्यावसायिक प्रशांत रहाटे, श्री. रत्नेश्वर देवस्थानचे अध्यक्ष श्रीकांत देसाई, तंटामुक्ती समिती अध्यक्ष दीपक जाधव, ज्येष्ठ नागरिक दत्ताराम रेवाळे, माजी अध्यक्ष शेखर देसाई, पशु अधिकारी, कृषी पर्यवेक्षक श्री. वाघमारे, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका, बचतगट महिला, ग्रामपंचायत कर्मचारी वृंद तसेच गावातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी दूरदृष्टी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे ग्रामसभेला मार्गदर्शन केले. आपल्या मनोगतात त्यांनी नमूद केले की, पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या ७५ व्या वाढदिवसाच्या औचित्याने महाराष्ट्र शासनाने “समृद्ध पंचायतराज अभियान” राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या अभियानांतर्गत पुढील शंभर दिवस ग्रामपंचायतींनी विविध कार्यक्रमांचे आयोजन करून लोकसहभागातून पंचायतराज व्यवस्था सक्षम व स्पर्धात्मक करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
सभेनंतर सरपंच अमर रहाटे यांनी ग्रामस्थांना आवाहन केले की, ३० सप्टेंबरपर्यंत पहिल्या टप्प्यात घरपट्टी १०० टक्के वसुली करण्याचे उद्दिष्ट ग्रामपंचायतीने ठेवले आहे. गावकऱ्यांनी या उपक्रमात सक्रीय सहभाग नोंदवून धामणसे राज्यात आदर्श ठरवेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ग्रामस्थांनी या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत घरपट्टी भरण्याचे आश्वासन दिले.
ग्रामसभेत गावाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी लोकसहभागाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. धामणसें ग्रामपंचायत राज्यस्तरावर या अभियानात पोचावी, अशी इच्छा ग्रामस्थांनी व्यक्त केली. केंद्र शाळा क्र. १ चे शिक्षक रसाळ सर व तायडे सर यांनी सभेची तांत्रिक बाजू कौशल्याने सांभाळली.
सभेचा समारोप सर्वांचे आभार मानून करण्यात आला. श्री. रसाळ सर यांनी उपस्थित मान्यवर सहभागी ग्रामस्थांचे आभार मानले.