
राजापूर तालुक्यातील वृद्धाचा मुंबईत उपचारादरम्यान मृत्यू
रत्नागिरी, : राजापूर तालुक्यातील कोतापूर येथील एका ६५ वर्षीय वृद्धाचा घरात पडल्यामुळे मणक्याला गंभीर दुखापत होऊन मुंबईतील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भिकाजी हरी कुंभार (वय ६५, रा. जानस्करवाडी, कोतापूर, ता. राजापूर) हे १३ जून २०२५ रोजी सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास त्यांच्या घरातील बेडवर झोपले होते. झोपेत असताना त्यांचा तोल जाऊन ते बेडवरून खाली पडले. या अपघातात त्यांच्या मणक्याला गंभीर मार लागून फ्रॅक्चर झाले.
अपघातानंतर त्यांना तातडीने रत्नागिरी येथील चिराये हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथे दोन दिवस डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार केले. परंतु, त्यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा झाली नाही. तसेच, रत्नागिरी येथे पुढील उपचारासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध नसल्यामुळे, त्यांना मुंबई येथील के.ई.एम. रुग्णालयात हलवण्यात आले.
के.ई.एम. रुग्णालयात २३ जून २०२५ रोजी सायंकाळी ७.४४ वाजता त्यांना दाखल करण्यात आले आणि त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यानच भिकाजी कुंभार यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले.
या घटनेची नोंद राजापूर पोलीस ठाण्यात अमृ. क्र. ३३/२०२५ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNSS) १९४ प्रमाणे करण्यात आली आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.