
सभागृह आगवेत बांधून फसवणूक, ग्रामस्थांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी
प्रवीण कोळापटे : जिल्हाधिकारी, मंत्री यांना निवेदन
रत्नागिरी, : तालुक्यातील हरचिरी-अहिल्यानगर ग्रामस्थांना आमदार निधीतून मंजूर झालेले सभागृह गावाबाहेर असलेल्या खासगी देवळाशेजारी शेड बांधून शासनाची आणि मंत्री उदय सामंत यांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी संबंधित ग्रामस्थांवर गुन्हे दाखल करून दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेचे माजी उपसरपंच प्रवीण कोळापटे यांनी केली आहे.
याप्रकरणी प्रवीण कोळापटे यांनी मंत्री उदय सामंत, जिल्हाधिकारी, कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद, हरचिरी आणि आगवे ग्रामपंचायत यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. लोकशाही मार्गाने कायद्याच्या चौकटीत राहून यासाठी लढा देणार असल्याचे कोळापटे यांनी सांगितले. हरचिरी गावात १० लाख रुपये सभागृहासाठी मंजूर झाले होते, परंतु या सभागृहाच्या कामासाठी कोणतीही निविदा काढलेली नाही. तसेच हरचिरी गावात बांधण्यासाठीचे सभागृह परस्पर आगवे ग्रामपंचायतीच्या हद्दीत बांधण्यात आले आहे. आगवे ग्रामपंचायत राजापूर-लांजा विधानसभा मतदारसंघात येते. याकामाची हरचिरी ग्रामपंचायती कोणतीही माहिती नाही. त्यामुळे हे सभागृह बांधणाऱ्या संबंधितांनी मंत्री, प्रशासनासह अहिल्यानगरमधील ग्रामस्थांचीही फसवणूक केली आहे. त्यांच्यावर गुन्हे दाखल करून दंडात्मक कारवाई करावी, असे कोळापटे यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.