
जयगड बंदरातील जहाजावर फिलिपिन्सच्या अभियंत्याचा मृत्यू
रत्नागिरी : जयगड येथील जे.एस.डब्ल्यू. पोर्टजवळ समुद्रात नांगर टाकलेल्या ‘एम.व्ही. डाली’ या जहाजावर फिलिपिन्सच्या इंजिनिअरचा मृत्यू झाल्याची घटना २० जून रोजी रात्री उशिरा घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. एलमीर अल्कारेज मोलीना (५१, रा. आरगाव, सेबु, फिलिपिन्स) असे मृत्यू झालेल्या अभियंत्याचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, इजिप्तमधून कोळसा घेऊन आलेले ‘एम.व्ही. डाली’ हे जहाज जे.एस.डब्ल्यू. पोर्टपासून सुमारे ५ नॉटिकल मैल समुद्रात नांगर टाकून उभे होते. गुरुवारी रात्री ८ वाजून २० मिनिटांनी, जहाजावरील सेकंड इंजिनिअर एलमीर अल्कारेज मोलीना (वय ५१, रा. आरगाव, सेबु, फिलिपिन्स) हे जेवण करून आपल्या केबिनमध्ये गेले होते. त्यानंतर ते परत न आल्याने इतर क्रू मेंबर्सनी त्यांची पाहणी केली.
पाहणी केली असता, मोलीना हे त्यांच्या केबिनमध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळले. क्रू मेंबर्सनी तातडीने त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले, परंतु ते शुद्धीवर आले नाहीत. त्यानंतर त्यांना जे.एस.डब्ल्यू. पोर्टच्या जेटीवर आणण्यात आले.
येथे खंडाळा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांनी टगमध्येच त्यांची तपासणी केली असता, मोलीना यांना मृत घोषित करण्यात आले. त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
या घटनेची नोंद जयगड पोलीस ठाण्यात २१ जून रोजी आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली आहे. जयगड पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.