
योग आचरणाने जीवन जगणे सुसह्य
न्यायाधीश सुनील गोसावी ः पतंजली परिवारातर्फे योग दिन साजरा
रत्नागिरी, : योग ही अनुभूतीची गोष्ट आहे व ती एक जीवनशैली आहे. ती आपण अनुसरण करावी. यातून आपल्याला जीवन जगणे सुसह्य होईल, असे प्रतिपादन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष सुनील गोसावी यांनी केले.
योगऋषी स्वामी रामदेवजी महाराजांच्या आशीर्वादाने संचलित पतंजली योग समिती व परिवाराच्या वतीने आयोजित अकराव्या जागतिक योगदिन कार्यक्रमात ते बोलत होते. देसाई बॅंक्वेट हॉलमध्ये आज सकाळी कार्यक्रमाला रत्नागिरीकरांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. तसेच सकाळ माध्यम समूहाचे या कार्यक्रमाला सहकार्य लाभले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून विधी सेवा प्राधिकरणचे सेक्रेटरी राजेंद्र पाटील, पतंजली योग समितीचे जिल्हा प्रभारी अॅड. विद्यानंद जोग, किसान सेवा समितीचे जिल्हा प्रभारी भारत सावंत व आयुर्वेदाचार्य विवेक इनामदार उपस्थित होते.
श्री. पाटील यांनी प्रास्ताविकामध्ये योग ही देणगी भारताने विश्वाला दिली आहे. भारताने युनोकडे २१ जून जागतिक योग दिनाचा प्रस्ताव दिला होता. त्यानुसार योग दिन जगभरात साजरा होत आहे. योग ही प्राचीन जीवनशैली आहे. नैराश्य व थकव्यावर मात करता येते. मन, मेंदू, मनगट बळकट करण्यासाठी योग सर्वोत्तम असल्याचे जगाने मान्य केले आहे.
स्वामीजींचे परमशिष्य, केंद्रीय मुख्य डॉ. परमार्थ देव यांच्या रत्नागिरी दौऱ्यात मेहनत घेतल्याबद्दल अॅड. जोग, नंदकिशोर जोशी यांचा सत्कार श्री. गोसावी यांच्या हस्ते करण्यात आला. सहयोगी योग शिक्षक पूर्वा पावसकर, प्रीती काळे, उमा घवाळी यांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. योगशिक्षक श्रीकांत ढालकर यांना ए. डी. फाउंडेशनचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाराष्ट्ररत्न पुरस्कार जाहीर झाला. त्याचा सोहळा आज पुण्यात झाला. परंतु हा पुरस्कार संस्थेने पाठवून दिला. श्री. गोसावी यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. नीता साने यांनी सूत्रसंचालन केले. अॅड. प्रिया लोवलेकर यांनी आभार मानले.
—-
गुरुकुलच्या विद्यार्थ्यांची आसने
रा. भा. शिर्के प्रशाला, नानल गुरुकुल व जीजीपीएस शाळांमधील विद्यार्थ्यांनी या वेळी योगासने, सूर्यनमस्कारांची प्रात्यक्षिके सादर केली. आयुर्वेदाचार्य विवेक इनामदार यांनी योग आयुर्वेद व जीवनशैली यावर भाषण केले. त्यानंतर जागतिक योग दिनाच्या प्रोटोकॉलमधील आसने व मार्गदर्शन अॅड. जोग यांनी केले. तसेच रसिका नारकर, आरोही पंडित व युक्ता पंडित यांनीही मंचावर व उपस्थितांनीही आसने सादर केली.