
योग दिनानिमित्त योग सत्राबरोबरच पाणी व स्वच्छतेचे विविध उपक्रम राबविण्यात येणार
रत्नागिरी : आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या दशकपूर्ती सोहळा म्हणून २१ जून रोजी देशभरात तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर ११वा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली जल जीवन मिशन व स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा-२ यांच्या समन्वयाने जिल्ह्यातील ग्रामीण भागात विशेष उपक्रम राबविण्यात येणार असल्याने ग्राम पाणी पुरवठा व स्वच्छता समिती व ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वैदेही रानडे यांनी केले.
आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रम उद्या (२१ जून) सकाळी ६.३० ते ७.४५ रोजी आयोजित करण्यात आला आहे. योग संगम हे व्यापक जनसहभाग आणि मोठ्या प्रमाणावर योग प्रात्यक्षिकांची परंपरा पुढे नेण्यासाठी आयोजित करण्यात आले आहे. यासाठी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीमधील ग्राम आरोग्य पोषण पाणी पुरवठा व स्वच्छता समित्या किंवा परिसरातील आयुषमान आरोग्य मंदिर यांच्या सहकार्यानेही आयोजित करण्यात येणार आहेत.
हरित योगमध्ये हरित योग उपक्रम पारंपरिक योगाभ्यासासोबत पर्यावरणीय शाश्वततेला देखील प्रोत्साहन देण्यात येणार आहे. यावर्षीच्या योग दिनाच्या कार्यक्रमांतर्गत योग सत्रांबरोबरच समुदायाच्या पुढाकारातून राबविण्यात येणाऱ्या पर्यावरणीय उपक्रमांचा समावेश केला जाणार आहे. ग्राम आरोग्य पोषण पाणी पुरवठा व स्वच्छता समित्या या उपक्रमांना हरित योग अंतर्गत योग दिनाच्या कार्यक्रमात एकत्रितपणे राबविता येणार आहे.
यावर्षीच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमात बॉश केंद्रित (पाणी, स्वच्छता व आरोग्य) दृष्टिकोन समाविष्ट करण्याचे आवाहन करण्यात आले आहे, जेणेकरून योग, आरोग्य व वॉश यांच्यातील संबंध अधोरेखित करता येईल. तसेच ग्राम आरोग्य पोषण पाणी पुरवठा व स्वच्छता समिती सदस्य व इतर जल जीवन मिशन आणि स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा-२ संबंधित लाभार्थ्यांची बैठक आयोजित करणे, कार्यक्रमाआधी परिसर व पाणी स्वच्छता आरोग्य संबंधित पायाभूत सुविधा स्वच्छ करणे, महत्त्वाच्या जल जीवन मिशन आणि स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा-२ मालमत्तांसमोर योग सत्र आयोजित करणे, समुदाय, योग क्रिया व योजनांची मालमत्ता दर्शविणाऱ्या स्पष्ट छायाचित्रांची नोंद केली जाणार आहे.
दरम्यान या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमात सर्व संबंधित घटकांनी सक्रिय सहभाग घेऊन व कार्यक्रमाचे आयोजन करून कार्यक्रम अधिकाधिक यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत, असे आवाहन असे प्रकल्प संचालक (पाणी व स्वच्छता) श्री. राहुल देसाई यांनी केले आहे.