
शेतघराला आग लागून लाखो रूपयांचे नुकसान
रत्नागिरी : तालुक्यातील नेवरे गावातील रफिक रज्जाक नाकाडे यांच्या शेतघराला शाॅर्टसर्किटमुळे सोमवारी (दि.२ जून) मध्यरात्री आग लागली. शेतघरात ठेवलेले साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले असून तीस लाखाचे नुकसान झाले आहे.
रफिक नाकाडे यांची नेवरे गावामध्ये आंबा बाग असून या बागेत त्यांनी चिरेबंदी शेतघर बांधले आहे. पावसाळ्यामुळे शेतीपंप, ग्रास कटर, फवारणी पंप, फवारणीसाठी लागणारे स्प्रे, पाईप, जनरेटर, पाॅवर टिलर, पाण्याच्या टाक्या, पाण्याचे पंप, चार हजार लाकडी खोक्याची कापलेली पट्टी. खोका पट्टी कापण्याचे मशीन, आंबा काढणीसाठी लागणारे झेले, क्रेट, खते, कीटकनाशके याशिवाय विविध प्रकारची अवजारे शेतघरामध्ये सुरक्षित ठेवण्यात आली होती.
सध्या बागेत खते घालण्याचे काम सुरू असल्याने नेहमीप्रमाणे रफिक यांचे बंधू नुरमहमद नाकाडे सोमवार दि. २ जून रोजी सकाळी कामगारांसह बागेत गेले असता, त्यांना धूर दिसला त्यामुळे ते शेतघरापर्यंत गेले असता, इमारत व त्यातील साहित्य जळत असल्याचे निदर्शनास आले. प्लास्टिक साहित्य धुमसत असल्याने सर्वत्र मोठ्या प्रमाणावर धूर पसरला होता. आग मोठी असल्याने शेतघरावरील पत्रे, लोखंडी खांब सुध्दा वितळले. घटनेचे वृत्त समजताच नाकाडे कुटूंबिय व ग्रामस्थांच्या मदतीने विझविण्यात आली. मात्र आधीच सर्व साहित्य
जळाल्यामुळे केवळ राख व इमारतीच्या भिंती तेवढ्या शिल्लक राहिल्या आहेत. आग लागून इमारत व साहित्याचे लाखो रूपयांचे नुकसान झाल्याने महसूल, महावितरण तसेच ग्रामीण पोलिस यंत्रणेकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. संबंधित यंत्रणांकडून घटनास्थळाचा पंचनामा करून तक्रार नोंदविण्यात आली आहे.