
बीएसएनएलच्या सेवेचा बोजवारा; विनायक राऊतांचा मोर्चाचा इशारा
रत्नागिरी: जिल्ह्यात भारत दूरसंचार निगम लि. (बीएसएनएल) सेवा म्हणजे एखाद्या रुग्णाचे सर्व अवयव निकामी होऊन ती व्हेंटिलेटरवर गेल्यासारखी आहे. जिल्ह्यातील 106 टॉवरपैकी बीएसएनएलचे 48 टॉवर बंद आहेत. काही ठिकाणी बॅटरी नाही, महावितरणची जोडणी नाही, जनरेटरला डिझेल नाही, सोलर पॅनल नाही, बील न भरल्याने विद्युत पुरवठा बंद आहे. अशी वाईट अवस्था आहे. यावर कंपनीकडे काहीच उपाययोजना नाहीत. यात सुधारणा न झाल्यास मुंबई ऑफिसवर मोर्चा काढु, असा इशारा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी खासदार विनायक राऊत यांनी दिला.
उबाठाचे माजी खासदार विनायक राऊत यांच्या नेतृत्वाखाली आज बीएसएनएलच्या खराब सेवेचा जाब विचारण्यासाठी येथील मुख्यप्रबंधक कार्यालयावर धडकले. यावेळी जिल्हा प्रमुख दत्ता कदम, रत्नागिरी तालुका प्रमुख शेखर घोसाळे, संजय पुनसकर, श्री. देसाई आदी उपस्थित होते. मुख्य प्रबंधक सौ. अमृता लेले, श्री. बोंगले, श्री. शिरसाट आदी बीएसएनएलचे अधिकारी उपस्थित होते.
खासदार राऊत यांनी रत्नागिरी, लांजा, राजापूर देवरुख आदी भागातील बीएसएनएलच्या कोलमडलेल्या सेवेबाबत विचारणा केली. प्रत्येक टॉवर निहाय सेवेचा आढावा घेतला. रत्नागिरीमध्येच स्टेट बॅंक कॉलनी, मिऱ्या, झाडगाव, आदी भागामध्ये बीएसएनएलची रेंज येत नाही. कॉल एकमार्गी होणे, ऐकायला न जाने, अशा तक्रारी केल्या. तुम्ही सेवेत सुधारणा करणार नसाल तर आम्ही कार्ड बदलु, असा इशाराही देण्यात आला.
याबाबत वर्षानुवर्षे तक्रारी केल्या जात आहेत. परंतु तक्रारी करूनही सुधारणा नाही. फोन केला तर कर्मचारी आरेरावीची भाषा करत आहेत , हे योग्य नाही असे सांगण्यात आले. याबाबत मुख्य प्रबंधक अमृता लेले यांनी तक्रारीबाबत संपुर्ण माहिती लिहुन घेतली आणि त्या लवकरात लवकर सोडवु, असे आश्वासन
दिले. तसेच अपशब्द न वापरता चर्चा करू, असेही स्पष्ट केले.
बीएसएनएलच्या खराब सेबेबाबत दिवसाला 30 तक्रारी येतात आणि त्या आम्ही तीन दिवसांमध्ये सोडवतो, असे कंपनीच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मग सेवेबाबत दीड वर्षे आमच्या तक्रारी आहे, त्या तुम्ही का सोडवल्या नाहीत, असा सवार शिवसैनिकांनी केला. त्यावर कंपनीकडे ठोस उत्तर नव्हते. लांजा, भांबेड, हरचिरी, गणेशगुळे, फणसवळे, दांडेआडोम, वडिलिंबू, चांदोरचा टॉवर आदीबाबत तक्रारी मांडल्या. परंतु कंपनीकडुन थातुरमातुर उत्तरे मिळाली. शिवसैनिकांच्या प्रश्नाचे समाधान करु शकले नाही. पुढच्या महिन्यात पुन्हा आढावा घेऊ तेव्हा ठोस उत्तरे द्या अन्यथा आम्हाल वेगळ्या भाषेत सांगावे लागले, असा इशाराही श्री. राऊत यांनी दिला.
सेवेसाठी 5 जी मोबाईल आवश्यक
लांजा, राजापुर येथील 11 टॉवरना रेंज नाही, अशाही तक्रारी आहेत. परंतु बीएसएनएल हे मान्य करायला तयार नाही. बीएसएनएलच्या आता 2 जी सेवे ऐवजी 4 जी सेवा सुरू झाली आहे. त्यामुळे फाय जी मोबाईल असल्याशिवाय रेंज मिळणार नाही. अनेक ग्राहकांचे जुने मोबाईल संच आहेत. ते बदलण्याची गरज आहे. परंतु याबाबत ग्राहकांना सांगुत ही तांत्रिक बाब लक्षात घेत नाही, असा दावा बीएसएनएल कंपनीने केला आहे.