
जिल्ह्यात तीव्र कुपोषित बालकांच्या प्रमाणात घट
ग्रामीण बालविकास केंद्राद्वारे पोषण आहार
रत्नागिरी: कुपोषित बालके ही राज्यातील अनेक वर्षांची समस्या आहे. त्यावर मात करण्यासाठी सरकारकडून सातत्याने पाठपुरावा, वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कुपोषित बालकांचे प्रमाण खूपच कमी झाले आहे. सध्या जिल्ह्यात ४० तीव्र कुपोषित बालके आहेत. त्यांना अतिरिक्त पोषण आहार देण्यासाठी ग्रामीण बालविकास केंद्रे सुरू करण्यात आली असून, त्याची जबाबदारी अंगणवाडी सेविकांवर दिली आहे.
जिल्ह्यात शून्य ते ६ वर्षे वयोगटातील ५१ हजार ७६० बालकांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये ६३४ बालके मध्यम तीव्र कुपोषित (मॅम) तर त्यातील ४० बालके तीव्र कुपोषित (सॅम) आहेत. वयानुसार कमी वजनाची ६४८ बालके आढळली आहेत. अतिकुपोषित बालकांची काळजी घेण्यासाठी जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत ग्राम बालविकास केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागाकडून रत्नागिरी जिल्हा कुपोषणमुक्त व्हावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या बालकांचा महिला व बालकल्याण विभाग वेळोवेळी आढावा घेत आहे आणि संबंधितांना पूरक सूचनाही देण्यात येत आहेत. मंडणगड तालुक्यातील १३, दापोली ६, खेड १, चिपळूण १, गुहागर १, संगमेश्वर ३, रत्नागिरी ११, लांजा १, राजापूर तालुक्यात ३ बालके कुपोषित आहेत.