
रत्नागिरीत येत्या १५ दिवसात शिवसेनेत मोठा प्रवेशः ना. सामंत
रत्नागिरी
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या होवू घातलेल्या सर्व निवडणुका महायुतीच्या माध्यमातून लढवण्याचा चंग बांधण्यात आल्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरीत पत्रकारांशी बोलताना सांगितले. मुंबई महानगरपालिका ते रत्नागिरीपर्यंत सर्व स्थानिक स्वराज्य संस्था महायुतीच जिंकणार, असल्याचा दावाही सामंत यांनी केला आहे. तर येत्या १५ दिवसांत रत्नागिरीत अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शनिवारी मान्सूनपूर्व आढावा बैठकीच्यानिमित्ताने रत्नागिरी दौऱ्यावर असलेल्या मंत्री उदय सामंत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यांनी सांगितले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुका महायुतीनेच लढविण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र लवकरच जागा वाटपाच्या फॉर्म्युलाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यावर निर्णय घेतील, असे मंत्री सामंत यांनी सांगितले.
सध्या शिवसेनेत राज्यभरात पक्षप्रवेशाचा जोर वाढलेला आहे. पुणे येथे कात्रज विकास आघाडीचे नमेश बाबर यांच्या ३५० प्रमुख पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. रत्नागिरीतही येत्या १५ दिवसानंतर पदाधिकारी सुटीवरून आल्यानंतर राजीनामे देऊन थेट शिवसेनेत पक्षप्रवेशाने येणार असल्याचे सूचक विधान सामंत यांनी केले आहे. त्यामुळे या त्यांच्या राजकीय विधानाने येथील राजकीय वर्तुळाच्या नजरा खिळल्या आहेत.