
भाडेवाढीमुळे रत्नागिरी एसटी आगाराच्या उत्पन्नात वाढ
रत्नागिरी :
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाने नव्या वर्षात एसटीची भाडेवाढ करण्यात आली होती. या भाडेवाढीमुळे लाल परी मालामाल झाली आहे अन् उत्पन्नातही चांगली वाढ झाली आहे. दररोज दीड ते दोन लाखांची उत्पन्नात भर पडली आहे. एकंदरीत, तीन महिन्यात तब्बल १ कोटी ३५ लाखांचे उत्पन्न रत्नागिरी आगाराला मिळाले आहे.
राज्याच्या ग्रामीण भागाची जीवनवाहिनी म्हणून लालपरीची ओळख मात्र डिझेल, चेसीस, टायर या घटकांच्या किमती वाढल्यामुळे तसेच इतर कारणांमुळे एसटी महामंडळाने आपल्या सर्व प्रकारच्या सेवांमध्ये २५ जानेवारी २०२५ पासून तब्बल १४.९५ टक्के इतकी भाडेवाढ केली. यामुळ सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागली. प्रवाशांमधून संताप व्यक्त करण्यात येत होता. काही संघटना, पक्षांनी भाडेवाढ मागे घ्यावी यासाठी आंदोलनेही केली होती मात्र त्याला न जुमानता भाडेवाढ केली आहे.
एसटी बसेसच्या तिकीटात १४.९५ टक्के इतकी भाडेवाढ केल्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसली आहे. त्यामुळे काही प्रमाणात एसटीच्या प्रवाशांची संख्या कमी झाल्याचे सांगण्यात आले. लांब पल्ल्याच्या गाडीत विशेषता संख्या कमी झाली असून त्याची जागा खासगी ट्रॅव्हल्सने घेतली आहे.