
अवकाळी पावसामुळे आंबा पिकाचे नुकसान
रत्नागिरी: बुधवारच्या पहाटे जोरदार वाऱ्यामुळे नागरिकांची दाणादाण उडलेली असतानाच गुरुवारी सकाळी 9 वा. आणि सायंकाळी 4.15 वा. पडलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांपुढे मोठे संकट उभे राहिले आहे. अंतिम टप्प्यातील आंबा गळून पडला आहे. झाडावर असलेल्या आंब्याच्या गुणवत्तेवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
गुरुवारी पहाटेपासूनच वातावरणात बदल जाणवत होते. सोसाट्याचा वारा सुटल्यानंतर सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. ढगांच्या कडकडाटासह कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. रत्नागिरी शहर आणि लगतच्या गावांसह लांजा, पाली, देवरुख, संगमेश्वर आणि गणपतीपुळे परिसरात जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे आंबा आणि काजूच्या बागांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे विशेषतः आंबा बागायतदार आणि विक्रेत्यांमध्ये या पावसामुळे चिंतेचे वातावरण पसरले आहे. अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे आंब्याच्या पिकांचे मोठ्या प्रमाणा नुकसान झाले आहे.
कोकणचा आंबा हा स्थानिक अर्थव्यवस्थेचा कणा मानला जातो. यंदा आंब्याच्या हंगाम जेमतेमच असताना या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे धाबे दणाणले आहे. पावसामुळे फळांची गुणवत्ता आणि उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे बागायतदार आणि विक्रेत्यांचे आर्थिक नुकसान होऊ शकते.
स्थानिक बाजारपेठेतही आंब्याच्या किमतींवर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. नागरिक आणि शेतकऱ्यांनी सतर्क राहून आवश्यक खबरदारी घ्यावी, असे प्रशासनाने सुचवले आहे.