
चिपळुणात केवळ एका टँकरने पाणीपुरवठा
२० वाड्यांना टँकरची प्रतीक्षा
चिपळूण: मार्चपासून सुरू झालेली तालुक्यातील पाणीटंचाईची तीव्रता दिवसेंदिवस वाढतच आहे. सध्या केवळ एका खासगी टँकरच्या आधारे ८ गावातील १२ वाड्यांमधील १३०० लोकांना पाणीपुरवठा केला जात आहे. तर अजूनही सुमारे ८ गावच्या २० वाड्यांतील महिला व ग्रामस्थांना टॅंकर कधी सुरू होणार, याची प्रतीक्षा आहे.
चिपळूण तालुक्याच्या प्रत्येक डोंगरखोऱ्यात धरण व्यवस्था आहे. त्यातून दसपटी, डेरवण, खाडीपट्टा या भागात सहजपणे सर्व गावांची तहान भागेल या पद्धतीने धरणाचे जाळे तयार झाले आहे; मात्र यातील मालघर, कळवंडे, खोपड, कामथे फणसवाडी, असुर्डे, आंबतखोल, अडरे, मोरवणे ही धरणे अनेक वर्षे जुनी असून, लघुपाटबंधारे योजनेअंतर्गत त्याच्या भिंती दगडमातीच्या पिचिंगने उभारलेल्या आहेत. आता या धरणांना जागोजागी गळती लागली असल्याने त्याची पाणी साठवणक्षमता काहीअंशी कमी झाली आहे. विशेषतः कळवंडे व डेरवणच्या धरणाला मोठे दुरुस्तीचे काम निघाले असल्याने त्याचा फटका या भागातील गावांना बसत आहे. डेरवण हद्दीतील सावर्डे, डेरवण खुर्द, दुर्गेवाडी या गावांना तसेच कळवंडे धरणामुळे कळवंडे, पाचाड, कोंढे, मिरजोळी आदी गावांना पाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. येथे २०२१ मध्ये झालेल्या अतिवृष्टीत तालुक्यातील दसपटी विभागातील तिवरे धरण फुटले तेव्हापासून या विभागातील बहुतांशी गाव पाणीटंचाईचा सामना करत आले; मात्र आता नवीन ग्रॅव्हिटी पाणीयोजनेमुळे या भागातील काही गावांची तहान भागली आहे. अजूनही धनगरवाड्यांची समस्या सुटलेली नाही. सद्यःस्थितीत टेरव धनगरवाडी, तांबडवाडी, वेतकोंड, दत्तवाडी, अडरे धनगरवाडी, कोंडमळा धनगरवाडी, सावर्डे धनगरवाडी, कुडप धनगरवाडी व अनारी धनगरवाडी, कादवड येथील दोन्ही धनगरवाड्या, डेरवण वरची बौद्धवाडी, आदी ८ गावांतील १२ वाड्यांना ३ एप्रिलपासून टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. या व्यतिरिक्त नारदखेरकी, कोसबी, करंबवणे, पाचाड, डेरवण, कादवड, कामथेखुर्द, तिवरे, रेहेळभागाडी वैजी या गावांमधूनही टँकरची मागणी मागणी करण्यात आली आहे; मात्र टँकरअभावी पाणीपुरवठा करण्यात अडचणी येत आहेत.