
बारावीचा निकाल जाहीर; राज्यात पुन्हा कोकणाची बाजी
मुंबई: महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावी परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला. राज्याचा निकाल ९१.८८ टक्के इतका लागला आहे. पुन्हा एकदा ९ विभागीय मंडळांमध्ये कोकण विभागाने बाजी मारलीय. कोकण विभागाचा निकाल ९६.७४ टक्के इतका निकाल लागलाय. तर सर्वात कमी निकाल लातूर विभागाचा लागला आहे. लातूरमध्ये ८९.४६ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झालेत.
राज्यातील नऊ विभागीय मंडळांमधून सर्व शाखांच्या १४ लाख २७ हजार ८५ नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. राज्यात कोकण विभागाचा निकाल ९६.७४ टक्के असा सर्वाधिक असून लातूर विभागाचा ८९.४६ टक्के असा सर्वात कमी निकाल आहे. तर उत्तीर्ण मुलींच्या निकालाची टक्केवारी ९४.५८ टक्के असून मुलांचा निकाल ८९.५१ टक्के आहे. उत्तीर्ण मुलींच्या निकालाची टक्केवारी मुलांपेक्षा तब्बल ५.०७ टक्क्यांनी जास्त आहे.
नऊ विभागीय मंडळ
पुणे ९१.३२
नागपूर ९०.५२
छत्रपती संभाजीनगर ९२.२४
मुंबई ९२.९३
कोल्हापूर ९३.६४
अमरावती ९१.४३
नाशिक ९१.३१
लातूर ८९.४६
कोकण ९६.७४
38 कॉलेजचे सर्व विद्यार्थी नापास
एकही विद्यार्थी १०० टक्के असणारा नाहीय अशी माहिती बोर्डाने दिली. तर ३५ टक्के कुणाला पडलेत की नाही याची माहिती वेगळी काढण्यात आलेली नाही. १९२९ कॉलेजचा निकाल १०० टक्के लागलाय. ९० ते ९९ टक्के ४०६२ पेक्षा जास्त कॉलेज आहेत. तर ३८ कॉलेजचा निकाल हा शून्य टक्के लागला.