
रत्नागिरीत ‘महाबोधी बुद्ध विहार’ मुक्तीसाठी 7 मे रोजी जनआक्रोश महामोर्चा!
रत्नागिरी
रत्नागिरी जिल्हा बौद्ध समाजाच्या वतीने बिहार येथील महाबोधी बुद्ध विहार मुक्तीसाठी आणि बौद्ध बांधवांच्या धार्मिक हक्कांसाठी भव्य जनआक्रोश महामोर्चा काढण्यात येणार आहे. हा मोर्चा येत्या बुधवार, दिनांक ७ मे २०२५ रोजी सकाळी ११.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी येथे धडकणार आहे. अशी माहिती डॉ बाबासाहेब आंबेडकर भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत प्रमुख आयोजक अनंत सावंत यांनी दिली.
बौद्ध समाजाच्या धार्मिक अस्मितेचा मुद्दा ठरलेल्या महाबोधी बुद्ध विहाराच्या सुटकेसाठी हा मोर्चा निर्णायक ठरणार आहे. १९४९ साली लादलेला अन्यायकारक कायदा रद्द करावा आणि महाबोधी बुद्ध विहाराचे बौद्ध धर्मीयांना ताबा द्यावा, तसेच रत्नागिरीतील थीबा कालीन बौद्ध विहार जागा समाजाच्या ताब्यात देण्यात यावी या प्रमुख मागण्यांसाठी हा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे.
मोर्चाची सुरुवात 7 मे रोजी सकाळी 11.30 वाजता रत्नागिरीतील मारुती मंदिर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून होणार आहे, नंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली जाईल. तसेच यानंतर जिल्हाधिकारी यांना मागण्या संदर्भात निवेदन सादर केले जाईल अशी माहिती सावंत यांनी दिली. तरी मोर्चामध्ये जिल्ह्यातील सर्व बौद्ध बांधवानी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन सावंत यांनी केले.
या पत्रकार परिषदेत विजय जाधव एल व्ही पवार, राजेंद्र अहिरे प्रकाश पवार , विजय जाधव ( राजापूर), अजय कांबळे, राजेंद्र कांबळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.