
नोंदणी नसलेल्या नौकांकडून मासेमारी
शाश्वत मच्छीमार हक्क संघः बंदी न घातल्यास कायदा घेऊ हातात
रत्नागिरी : तालुक्यातील जयगड, काळबादेवी, साखरतर आदी ठिकाणी बेकायदेशीर मासेमारी सुरू आहे. नोंदणी नसणाऱ्या काही नौका पर्ससीन रापण (जाळी) चढवून बिनधास्त मासेमारी करत आहेत. कोणाच्या आशीर्वादाने ही मासेमारी सुरू आहे? मत्स्यविभाग या बेकायदेशीर मासेमारीला कधी लगाम घालणार? असा सवाल रत्नागिरी तालुका शाश्वत मच्छीमार हक्क संघाने उपस्थित केला आहे. ही मासेमारी बंद न झाल्यास कायदा हातात घेऊ, असा इशाराही संघाने दिला आहे.
अस्तित्वात नसणाऱ्या नौकांच्या नोंदणी क्रमांकाचा वापर करून बेकायदेशीर मासेमारी करण्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी उघड झाला आहे. एक नव्हे तर दोन प्रकार उघड झाल्यामुळे मत्स्य विभागदेखील बुचकळ्यात पडला आहे; परंतु आता अशा प्रकार नोंदणी नसणाऱ्या नौका बिनधास्त मासेमारी करत असल्याचा प्रकार शाश्वत मच्छीमार हक्क संघाने पुढे आणला आहे. काळबादेवी, साखरतर, जयगड बंदरात अनधिकृत मासेमारीला ऊत आला आहे.
पर्ससीन सामुग्री हायड्रोलीक विंच (बुम) पर्ससीन रापण, (एकदमच छोट्या आसाची जाळी) बेकायदेशीर ३० ते ३५ खलाशी (कामगार) चढवून राजरोस बेकायदेशीर पर्ससीन नेटने मासेमारी करत आहेत. ही बेकायदेशीर मासेमारी येत्या ४ दिवसांत बंद न केल्यास शाश्वत मच्छीमार हक्क संघांचे मच्छीमार बांधव मिरकरवाडा जेटीवर उतरणार आणि कायदा हातात घेतील, असा इशारा
संघांचे अध्यक्ष छोट्या भाटकर, सदस्य कंचू मयेकर, अमरेश घातकर, शंकर शिवलकर, पिंकू बिर्जे, सचिन टाकळे, संजय विलणकर, किशोर माईन, शुभम पाटील, समीर शेट्ये, रूपेश पाटील, कुंदन शेट्ये, गुरूनाथ शिरगावकर, अनिल शिरगावकर, गोट्या नार्वेकर, अमर पवार, बबलू शिवलकर, दिलीप सुर्वे, रोहिदास पारकर, दत्तगुरू कीर आदींनी दिला आहे.