
राजापूरात ट्रॅक्टर पलटी झाल्याने चालकाचा मृत्यू
राजापूर: शहरातील वरचीपेठ येथे शुक्रवारी सकाळी एका दुर्दैवी घटनेत तीव्र उतारावर ट्रॅक्टर पलटी झाल्याने चालक प्रमोद पांडुरंग मांजरेकर (वय ५१) यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे वरचीपेठ परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रमोद मांजरेकर हे शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणे आपला ट्रॅक्टर घेऊन कामासाठी निघाले होते. त्यांचे घर वरचीपेठ येथे असून घराला लागूनच तीव्र उताराचा रस्ता आहे. याच ठिकाणी अचानक प्रमोद यांचा ट्रॅक्टरवरील ताबा सुटला आणि ट्रॅक्टर पलटी झाला. या अपघातात प्रमोद ट्रॅक्टरच्या पुढच्या भागाखाली चिरडले गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेनंतर मांजरेकर कुटुंबीयांनी आरडाओरड केल्याने आसपासच्या नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तरुणांनी ट्रॅक्टर उचलण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना यश आले नाही.अखेरीस जेसीबीच्या मदतीने ट्रॅक्टर बाजूला करून प्रमोद यांना बाहेर काढण्यात आले. त्यानंतर त्यांना तातडीने राजापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
प्रमोद यांच्या अपघाती निधनाची बातमी शहरात पसरताच राजापूर ग्रामीण रुग्णालयात मोठी गर्दी झाली होती. प्रमोद हे एक प्रामाणिक आणि कष्टाळू व्यक्तिमत्व होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई आणि भाऊ असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाने मांजरेकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.प्रमोद यांनी काही काळ राजापूर नगर परिषदेत कंत्राटी चालक म्हणूनही काम केले होते आणि त्यांचा मोठा मित्र परिवार आहे. या घटनेमुळे संपूर्ण राजापूर शहरात हळहळ व्यक्त होत आहे.