
पेठमाप-मुरादपूर पूल पूर्ण, जोडरस्ता रखडला
प्रवासासाठी आणखी प्रतीक्षा : वाहतूककोंडी सुटण्यास मदत
चिपळूण:- शहरातील अत्यंत महत्त्वाचा आणि वाहतुकीवर उत्तम पर्याय ठरणारा पेठमाप-मुरादपूर पुलाचे काम अखेर रेलिंगसह सज्ज झाले आहे; मात्र अद्याप पुलाच्या जोडरस्त्याचे काम रखडले आहे. अजूनही जोडरस्त्याच्या कामाची निविदा प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे हे काम आणखी काही महिने लांबण्याची शक्यता आहे.
चिपळूण शहरातील पेठमाप आणि मुरादपूर ही दोन मोठी लोकवस्ती असणारे भाग वाशिष्ठी नदीमुळे विभागलेली आहेत. इंग्रजांच्या काळात येथे फरशी बांधण्यात आली होती. ओहोटीच्यावेळी या फरशीवरून वाहतूक केली जात होती. आता देखील काही प्रमाणात ती फरशी अस्तित्वात असून त्यावरून हलकी वाहने ये-जा करतात; परंतु भरतीच्यावेळी तसेच पावसाळ्यात पाण्याच्या प्रवाहामुळे येथील वाहतूक तसेच येण्या-जाण्याचा मार्गदेखील बंद पडतो. साहजिकच परिसरातील नागरिकांची मोठी गैरसोय होते. त्यामुळे येथे पूल व्हावा, अशी मागणी नागरिक कित्येक वर्ष करत आहेत. या मागणीची दखल घेत आमदार शेखर निकम यांनी मुरादपूर-पेठमाप असा पूल शासनाकडून मंजूर करून घेतला. त्यासाठी सुमारे १२ कोटी रुपये शासनाने मंजूर केले तसेच या पुलाच्या जोडरस्त्यासाठी ६ कोटीचा निधीही मंजूर केला आहे.
गेल्या काही वर्षांपासून या पुलाचे काम सुरू आहे. पावसाळ्यापूर्वी १६ पिलरचे काम पूर्ण करण्यात आले होते. त्यानंतर तातडीने पुलाचे गर्डर चढवण्याचे काम सुरू केले. एकीकडे हे काम सुरू असतानाच दुसऱ्या बाजूनी स्लॅब टाकण्याचे काम सुरू केले. बघता बघता या पुलावर स्लॅबचे काम पूर्ण होताच पुलावरील रेलिंगचे कामही अंतिम टप्प्यात सुरू आहे; मात्र आता पुलाच्या जोडरस्त्याचाच प्रश्न निर्माण झाला आहे. मुळात या कामावर आमदार शेखर निकम यांनी विशेष लक्ष केंद्रित केले असून, या कामाचा सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांमध्ये पुलाचे काम पूर्ण होऊन पूल वाहतुकीसाठी खुला होईल, असा आशावाद व्यक्त करण्यात येत आहे. हा पूल सुरू झाल्यास मुरादपूर, पेठमाप, दादर मोहल्ला, बेबल मोहल्लासह शहरातील बहुतांशी भाग जोडला जाणार आहे.