
पाणीटंचाई आराखड्यात सव्वादोन कोटींची वाढ
रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढण्याची शक्यता लक्षात घेवून पाणी पुरवठा विभागाने गतवर्षी पेक्षा यावर्षी २ कोटी २५ लाख रुपयांचा जास्तीचा पाणी टंचाई आराखडा तयार केला आहे. हा पाणी टंचाई आराखडा जिल्ह्यातील ३५७ गावांतील ७२२ वाड्यांसाठी बनविण्यात आला आहे. पाणी टंचाईची संभाव्य परिस्थिती लक्षात घेवून हा आराखडा बनविण्यात आल्याचे जी.प. पाणी पुरवठा विभागाकडून सांगण्यात येत आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात दरवर्षी भेडसावणारी पाणी टंचाई लक्षात घेता संभाव्य पाणीटंचाई आराखड्यात टँकरने पाणीपुरवठा करणे आणि अन्य उपाययोजनांसाठी ९ कोटी ४९ लाख ७० हजार रुपयांचा समावेश केला आहे. जानेवारी ते जून या कालावधीत ३५७ गावांतील ७२२ वाड्यांमध्ये पाणी टंचाईची शक्यता लक्षात घेऊन उपाययोजना या आराखड्यात सुचवण्यात आल्या आहेत. जिल्ह्याचा पाणी टंचाई आराखडा आर्थिक तरतुदीसाठी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या सचिवांकडे करण्यात आला आहे.
रत्नागिरी जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाकडून दरवर्षीप्रमाणे यावर्षीचा देखील जिल्ह्याचा टंचाई आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यामध्ये ऑक्टोबर ते डिसेंबर २०२४ या कालावधीत एकही टँकरची आवश्यकता भासलेली नसली तरी पहिल्या टप्यात २०२ गावांतील ३८१ वाड्यांकरिता ७ कोटी ७८ लाख ९० हजार रुपयांचा आराखडा तयार केला आहे.
या आराखड्यात नवीन विंधन विहिरीसाठी ९६ गावांतील १८४ वाड्यांसाठी २ कोटी २० लाख ८० हजार, नळपाणी पुरवठा योजना दुरुस्तीसाठी ३९ गावांतील ५९ वाड्यांतील ५९ योजनांसाठी ४ कोटी १३ लाख ५० लाख, तात्पुरती पूरक नळपाणी पुरवठा योजनांसाठी ११ गावांतील १९ वाड्यांमधील १९ योजनांकरिता ९८ लाख १० हजार, टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी २७ गावांतील ६१ वाड्यांसाठी १२ लाख ३० हजार रुपये आवश्यक आहेत.
मुंबई – गोवा महामार्गावर रविवारी अवजड वाहतूक बंदी
टंचाईवरील उपाययोजनांच्या कामांना ३१ मार्चपर्यंत मंजुरी घेणे आवश्यक आहे. ती मंजुरी मिळाली नाही, तर उर्वरित निधी शासनाकडून मिळणार नाही. यंदा टंचाई आराखडा बनवण्यात विलंब झालेला आहे. त्यामुळे या निधीतील उपाययोजनांच्या कामांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. सर्वसाधारण मार्चच्या दुसऱ्या आठवड्यापासून रत्नागिरी जिल्ह्यात टँकरने पाणीपुरवठा सुरू होतो, तसेच दुसऱ्या टप्यात म्हणजेच एप्रिल ते जून २०२५ या कालावधीकरिता १५५ गावांतील ३४१ वाडयांसाठी १ कोटी ७० लाख ८० हजार रुपयांचा आराखडा केला आहे.
त्यामध्ये टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी १ कोटी ९४ लाख ९८ लाख ४० हजार करण्यासाठी १०४ गावांतील २४३ वाड्यांकरिता २२ टँकरला ८० लाख १० हजार रुपये व विहीर खोल करणे, गाळ काढणे या कामांतर्गत ५१ गावांतील ९८ वाड्यांकरिता १० लाख ७० हजार रुपयांचा आराखड्यात समावेश आहे. जिल्ह्याच्या एकूण आराखड्यात ९ कोटी ४९ लाख ७० हजार रुपयांची तरतूद केली आहे. मागीलवर्षी पावणेसात कोटींचा आराखडा बनवण्यात आला होता. यंदा त्यात सव्वादोन कोटी रुपयांची वाढ झाली आहे.