
महामार्ग विभागाचा कारभार ७ महिन्यांपासून प्रभारींच्या हाती
खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील चौपदरीकरणाचे काम गेल्या १४ वर्षांपासून रखडले आहे. एकीकडे महामार्ग कामाच्या पूर्णत्वाचे घोडे अडलेले असताना दुसरीकडे कामावर देखरेख ठेवणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग रत्नागिरी विभागाचा कारभार गेल्या ७ महिन्यांपासून मुंबईतील प्रभारी अधिकाऱ्यांच्या हातात असल्याची बाब समोर आली आहे.
चौपदरीकरण कामासाठी नव्या तंत्रज्ञानाचा अवलंब करूनही मंत्र्यांसह राष्ट्रीय महामार्ग खात्याने आजवर दिलेल्या सर्व ‘डेडलाईन’ हवेत विरल्या आहेत. मुंबई-गोवा महामार्गावर आजमितीसही ‘वर्क इन प्रोग्रेस’चे फलक पहावयास मिळत आहेत. प्रत्यक्षात कामे संथगतीने सुरू असल्याने वाहनचालकांचा मनस्ताप कायम आहे. यंदाच्या शिमगोत्सवातही अपूर्णावस्थेतील कामामुळे गानी येणाऱ्या चाकरमान्यांचे कंबरडे मोडणार आहे. एकीकडे महामार्ग चौपदरीकरणांचे काम रखडले असताना दुसरीकडे राष्ट्रीय महामार्ग खात्याला ७महिन्यांपासून कार्यकारी अभियंताच नसल्याची बाब समोर आली आहे. मुंबईतील एका अधिकाऱ्याकडेच अतिरिक्त कारभार सोपवण्यात आला आहे.