
मुलं होण्यासाठी रत्नागिरीतील ५ वर्षीय चिमुरडीचा ‘नरबळी’
फोंडा येथील घटना; पती – पत्नीला अटक ; रत्नागिरीत संतप्तप्रतिक्रिया
रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील समुद्र किनाऱ्या लगतच्या एका गावातील असलेल्या व सध्या फोंडा येथून बेपत्ता झालेल्या 5 वर्षीय चिमुरडीचा मृतदेह घराच्या बाजूलाच गाडलेल्या स्थितीत आढळल्यामुळे खळबळ उडाली आहे. कसलये-तिस्क फोंडा येथे हा प्रकार उघडकीस आला आहे. घराच्या बाजूला मुलीचा मृतदेह जमिनीत गाडलेल्या स्थितीत आढळल्याने खळबळ उडाली आहे. वर्षभरापूर्वीच चिमुरडीचा आई तिला घेऊन रत्नागिरीतून फोंडा येथे आपल्या आईच्या घरी रहायला गेली होती. चिमुरडीचा नरबळी दिल्याचा संशय पोलिसांना आहे. या प्रकारामुळे रत्नागिरी शहरात संताप व्यक्त केला जात आहे.
मयत मुलीचे नाव अमेरा ज्युडान अन्वारी (वय 5) असे असून, ज्या घराशेजारी हा मृतदेह गाडलेल्या स्थितीत होता. त्या घराच्या मालकाला पत्नीसह फोंडा पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी हा प्रकार खुनाचा गुन्हा म्हणून नोंद केला असून, पुढील चौकशी सुरू आहे. दरम्यान, हा जादूटोण्याचा प्रकार असल्याचा संशय स्थानिकांकडून व्यक्त होत आहे.
कसलये-तिस्क येथील अमेरा अन्वारी ही चिमुरडी बडूहवर सकाळपासून बेपत्ता होती. यासंबंधी फोंडा पोलिस स्थानकात ती बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे. मात्र, ही मुलगी आपल्या आईसमवेत राहत असलेल्या घरासमोरील सुमारे 50 मीटर अंतरावरील अलाट कुटुंबियाच्या घरी ये-जा करीत होती म्हणून पोलिसांनी अलाट पती-पत्नीकडे पोलिसांनी चौकशी केली असता झाला प्रकार उघडकीस आला. घराच्या बाजूलाच या मुलीला मारून पुरल्याचे अलाट पती-पत्नीने कबूल केले. त्यामुळे संशयित पप्पू ऊर्फ बाबासाहेब अलाट व त्याची पत्नी पूजा अलाट या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अन्सारी आणि अलाट कुटुंबीय परप्रांतीय असून मागील अनेक वर्षे गोव्यात राहत आहेत. पप्पू आणि त्याची पत्नी पूजा या दांपत्याला मूलबाळ नाही. त्यामुळे मूलबाळ होण्याबरोबरच समृद्धी मिळावी, या हेतूनेच हा ‘नरबळी’ दिल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. पोलिस निरीक्षक विजयनाथ कवळेकर, उपअधीक्षक शिवराम वायंगणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास करीत आहेत. पोलिस अधीक्षक टिकमसिंग यांनीही घटनास्थळी येऊन पाहणी केली. अमेरा बुधवारी सकाळपासून बेपत्ता झाल्यानंतर तिच्या कुटुंबीय आणि शेजार्यांनी कसलये वस्तीत शोधाशोध सुरू केली होती. त्यानंतर फोंडा पोलिस स्थानकात अमेराच्या आईने मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली होती. फोंडा पोलिसांनी तपासाला वेग देताना वस्तीत घरोघरी सखोल चौकशीला प्रारंभ केला. बाबासाहेब याच्याकडे बुधवारी चौकशी केली असता तो थोडा गडबडला होता. गुरुवारी पुन्हा त्याची चौकशी केली असता तो असंबद्ध उत्तरे देऊ लागला आणि येथेच अडकला.
मूलबाळ होत नव्हते म्हणून…
बाबासाहेब हा एक उत्कृष्ट वेल्डर आहे. कसलये येथे राहण्यापूर्वी तो धारबांदोडा संजीवनी साखर कारखान्याजवळ राहत होता. लग्नाला वीस वर्षे उलटली तरी या दांपत्याला मुलबाळ होत नव्हते त्यामुळे त्याने जादू टोण्याने मूल व्हावे, समृद्धी यावी यासाठी हे अघोरी कृत्य केले असावे, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिस त्यादृष्टीने चौकशी करीत आहेत. घटनास्थळी फोंडा उपजिल्हाधिकारी शुभम नाईक, मामलेदार राजेश साखळकर, पोलिस अधीक्षक टिकम सिंग वर्मा,उपअधीक्षक शिवराम वांयगणकर, फॉरेन्सिक टिम, फोंडा पोलिस निरीक्षक विजयनाथ कवळेकर, म्हार्दोळ पोलिस निरीक्षक योगेश सावंत, कुळे पोलिस निरीक्षक राघोबा कामत, डॉ. मधु घोडकिरेकर उपस्थित होते.
नवरा मारझोड करत होता म्हणून रत्नागिरीतून गेली गोव्यात
अमेरा अन्वारी ही आपल्या आई आणि एका भावंडासह कसलये येथे राहत होती. अमेराची आईला लग्न करून रत्नागिरी शहरातील समुद्र किनारा लगतच्या एका गावात दिले होते. पण नवरा मारझोड करीत असल्याने ती दोन्ही मुलांसमवेत कसलये येथे आपल्या आईच्या घरी वर्षभरापूर्वी रहायला आली होती. अमेरा ही बाबासाहेब याच्या घरी अधूनमधून जायची. त्यामुळे दोन्ही कुटुंबात चांगले संबंध होते मात्र या संबंधांचा दुरुपयोग बाबासाहेब याने करून घाला घातल्याने स्थानिकांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.