
कचरा जाळल्यानंतर निघणाऱ्या धुरापासून शहरातील नागरिकांची मुक्तता करावी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार) युवक जिल्हाध्यक्ष नौसिन काझी यांची रत्नागिरी नगरपालिकेकडे निवेदनाद्वारे मागणी
रत्नागिरी : शहरातील साळवी स्टॉप येथील घनकचरा प्रकल्पात जाळण्यात येणाऱ्या कचऱ्यापासून विषारी धूर निघत असून, त्यापासून नागरिकांना अनेक त्रासांना सामोरे जावे लागत आहे. याबाबत नगरपालिकेने लवकरात लवकर मार्ग काढून नागरिकांना त्रासातून मुक्तता करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार) युवक जिल्हाध्यक्ष नौसिन काझी यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी काल (२४ फेब्रुवारी) रत्नागिरी नगर पालिकेचे मुख्याधिकारी तुषार बाबर यांना दिले आहे.
श्री. काझी यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आपल्या नगरपालिका हद्दीतील कचरा साळवी स्टॉप येथील घनकचरा प्रकल्पात जाळण्यात येतो. पण हा कचरा जाळल्यानंतर त्यापासून उत्पन्न होणारा धूर हा फार मोठ्या प्रमाणात असतो. म्हणजेच त्याचे प्रमाण एवढे भयानक असते की ह्या प्रकल्पाला लागून शहरातील जो भाग आहे म्हणजेच कोकण नगर, कीर्ती नगर, क्रांतीनगर, चर्मलय, स्टेट बैंक कॉलनी, प्रभाग क्रमांक तीनचा भाग, साळवी स्टॉप या भागामध्ये तर काहीच दिसेनासे होते. तसेच धुरापासून उत्पन्न होणारा दुर्गंधीयुक्त वासापासून या भागातील सर्वच नागरिकांना त्रास होत आहे. त्यामुळे या भागातील स्थानिक नागरिकांना वेगवेगळ्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. या गंभीर बाबीची दखल घेऊन शहरातील नागरिकांना नाहक होणाऱ्या त्रासातून मुक्त होण्याकरिता लवकरात लवकर मार्ग काढावा.”
यावर मुख्याधिकारी श्री. बाबर यांच्याशी चर्चा केल्यावर त्यांनी योग्य ती खबरदारी घेतली जाईल, असे आश्वासन दिले.