
थिबा पॅलेस येथे झाडांची कत्तल करणाऱ्या बिल्डरवर गुन्हा दाखल करण्यासाठी मनसे आक्रमक
रत्नागिरी : थिबा पॅलेस परिसरात झाडांची कत्तल करुन बेकायदेशीररित्या पत्रे उभे करणाऱ्या विकासकाविरोधात गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी मनसेने शहर पोलीस निरीक्षकांना पत्र दिले आहे.
रत्नागिरीतील थिबा पॅलेस परिसरात कलेक्टर यांच्या बंगल्यासमोर थिबा पॉईंटच्या एरियात विकासकाने बांधकामाची कोणतीही परवानगी नसताना तेथे पत्रे लावले आहेत. तसेच अनधिकृतपणे सुमारे एकशे चाळीस (१४०) झाडे तोडली आहेत. त्या झाडांचे बुंदे जाळून टाकले आहेत. याबाबत नगरपालिकेला कळविले असता स्वतः नगरपालिकेचे अधिकारी जागेवर आले होते, व त्यांनी पाहणी केली.
नगरपालिकेची दहा झाडे तोडण्याची परवानगी असताना अनधिकृतरित्या चाळीस झाडे तोडल्याचे नगर पालिकेच्या निदर्शनास आले. या संदर्भात नगरपालिकेने विकासकाला कारणे दाखवा नोटीसही काढली आहे. यासंदर्भात या घटनेच्यावेळी बरेच नागरिक उपस्थित होते. तसेच प्रत्यक्ष पाहणीत साधारणपणे २००-२५० झाडे तोडली असल्याचे निदर्शनास आले. ही जमिन तीव्र उताराची आहे. तेथील माती हळूहळू खाली घळत आहे. माती खाली घळल्याने ते खाली असणाऱ्या घरांचे नुकसान होणार आहे. संबंधित जमिन ही पर्यटनासाठी येणा-या लोकांना आवश्यक आहे. त्याठिकाणी बांधकामाची कोणतीही परवानगी नसताना विकासकाने बेकायदेशीर कृत्य केले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करणे, पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून अत्यंत आवश्यक आहे. ज्या विकासकाने बेसुमार वृक्षाची कत्तल केली त्या विकासकावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश सौंदळकर यांनी केली आहे.