
जांभूळ आड येथे बिबट्याकडून वासराचा फडशा
रत्नागिरी: तालुक्यातील जांभूळ आड येथील वसंत विठ्ठल चंदुरकर यांच्या गोठ्यातील गायीचे वासरू बिबट्याने मारून नेल्याने परिसरामध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. चंदुरकर यांच्या गोठ्यामध्ये एक वर्षाचे गायीचे वासरू बांधण्यात आले होते.चंदुरकर यांच्या गोठ्यामध्ये एक वर्षाचे गायीचे वासरू बांधण्यात आले होते.
रात्रीच्या वेळी अचानकपणे बिबट्याने त्याच्यावर हल्ला करून मारून नेले. सकाळी वासरू गोठ्यात दिसत नसल्याने चंदुरकर यांनी धावाधाव केली. त्यावेळी त्यांना हे वासरू बिबट्याने मारून दिल्याचे निदर्शनास आले. याची माहिती पोलिस पाटील यांना देण्यात आली. त्यानंतर बिबट्याच्या हल्ल्याबाबत वनविभागाला कळविण्यात आले.
या परिसरामध्ये बिबट्याचा वावर राजरोसपणे सुरू असल्यामुळे या भागात रात्री अपरात्री फिरणे धोकादायक ठरत आहे. या बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.