
राजापुरातील रेल्वे आरक्षण सेवा बंद
राजापूर : अखेर कोकण रेल्वे प्रशासनाने राजापूर पोस्ट कार्यालयातील पी. आर. एस. सेवा कायमची बंद केली असून हे कार्यरत असलेली मशिनरी ही काढून नेली आहे. त्यामुळे राजापूर तालुकावासियांना रेल्वे आरक्षणासाठी वणवण करावी लागणार आहे. कोकण रेल्वे प्रशासनाच्या मनमानीपणामुळे जनतेतून संताप व्यक्त केली जात आहे.
रत्नागिरी जिल्ह्यामध्ये संगमेश्वर, लांजा, राजापूर आणि लगतच्या गोवा राज्यामध्ये कानकोन येथे पोस्ट कार्यालयात कोकण रेल्वेची पी. आर. एस. (पब्लिक रिझर्व्हेशन सीस्टेम) कार्यरत होती. मात्र प्रतिदिन अपेक्षित व्यवहार होत नसल्याच्या कारणास्तव कोकण रेल्वेच्या वाणिज्य विभागाने या चारही पोस्ट कार्यालयात सुरू असलेली पी आर एस सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. तसा पत्रव्यवहार संबंधित पोस्ट कार्यालयांना पाठवण्यात आला होता.
कोकण रेल्वे प्रशासनाच्या त्या निर्णयाचे जोरदार पडसाद उमटले होते. पोस्ट कार्यालयातील आरक्षण सेवा बंद केल्यामुळे रेल्वे प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन माजी केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे तो विषय देण्यात आला. त्याची माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी तत्काळ दखल घेतली होती आणि वरिष्ठ स्तरावर चर्चा करून बंद करण्यात आलेली पोस्ट कार्यालयातील पी आर एस सेवा पूर्ववत सुरू करण्यास संबंधित विभागाला भाग पाडले होते. मात्र, त्यानंतर काही दिवस लोटतात कोकण रेल्वे प्रशासनाने आपला हेका कायम ठेवत पुन्हा ती सेवा बंद केली आहे.
विस्ताराने मोठ्या असलेल्या राजापूर तालुक्यासाठी राजापूर रोड हे एकमेव परिपूर्ण स्थानक असून राजापूर शहरापासून ते १५ किलोमीटर अंतरावर आहे. रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सुलभ आरक्षण मिळावे या उद्देशाने पोस्ट कार्यालयामध्ये पी आर एस (रेल्वे आरक्षण सेवा केंद्र) सुरू करण्यात आली होती. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये संगमेश्वर आणि लांजा येथे मागील काही वर्षे ती कार्यान्वित होती. तर एक वर्षांपूर्वी राजापूर पोस्ट कार्यालयात ती सुरू करण्यात आली होती. राजापूरमध्ये या सुविधेचा रेल्वे प्रवासी चांगल्या पद्धतीने लाभ घेत होते. मात्र, अचानक कोकण रेल्वे प्रशासनाने ही सुविधा कायमस्वरूपी बंद केल्यामुळे रेल्वे प्रवाशांचे नुकसान होणार असून त्यामुळे जोरदार संताप् व्यक्त केला जात आहे. आता या प्रकरण कोकणातील खासदारांचे लक्ष वेधण्याच्चे प्रयत्न सुरू झाले आहेत.