
अनेक शाळा परिसरात यलो लाईन कागदावरच
रत्नागिरी: शहरासह जिल्ह्यातील अनेक शाळा परिसरात कोटपा कायदा फाट्यावर बसवत पानटपर्यांवर तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांची सर्रास विक्री होत आहे. शाळा-महाविद्यालयांचे नवीन शैक्षणिक वर्षातील दुसरे सत्र सुरू होऊनही शाळा व्यवस्थापनांना यलो लाईनचा विसर पडला आहे. यलो लाईन कागदावरच राहिल्याने अल्पवयीन मुलांमध्ये व्यसनाधीनता वाढत आहे.
राज्यात 18 वर्षांखालील मुलांमध्ये अमली पदार्थांचे व्यसन लागू नये, यासाठी कोटपा कायद्यांतर्गत शैक्षणिक संस्था, शाळांच्या 100 यार्डच्या परिसरामध्ये तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ विक्री, उत्पादन, वितरण व साठवणुकीस प्रतिबंधासाठी ‘यलो लाईन’ आखली जाते. शाळा परिसरात खाद्यपदार्थ गाडे, पानटपर्यांवर तंबाखजन्य पदार्थांच्या विक्रीला आळा घालण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने यलो लाईन मोहीम राबवली होती.
शाळा परिसराच्या 100 मीटर अंतरामध्ये तंबाखूजन्य पदार्थांना खरेदी-विक्रीला प्रतिबंध घालण्यात आला होता. त्यावेळी जिल्ह्यातील बहुतांश शाळांनी यलो लाईन ओढल्या होत्या; मात्र मागील वर्षात तसेच नवीन शैक्षणिक वर्षातील दुसरे सत्र सुरू झाले तरी शाळा व्यवस्थापनांना यलो लाईनचा विसर पडल्याचे वास्तव समोर येत आहे. अनेक शाळा परिसरांमध्ये पानटपर्यांचे प्रस्थ वाढले असून तंबाखूजन्य पदार्थांची खरेदी-विक्री होत आहे.
जागतिक युवा तंबाखू सर्वेक्षण 2019 नुसार देशात 13 ते 15 वयोगटातील बालकांचे तंबाखू सेवन करण्याचे प्रमाण 5.1 टक्के आहे. 18 वर्षांवरील नागरिकांना तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे व्यसन लागू नये यासाठी कोटपा 2003 कायद्याची अंमलबजावणी राज्यभर करण्यात येत आहे.
व्हाईटनरसह विविध नशेच्या पदार्थांची झिंग विद्यार्थ्यांमध्ये दिसत आहे. नशेच्या आहारी गेल्यानेच अल्पवयीन मुलांचा गुन्हेगारीतील सहभागही वाढत आहे.
कोटपा कायदा म्हणजे काय?
सिगारेट आणि अन्य तंबाखूजन्य उत्पादने प्रतिबंध कायदा अधिनियम 2003 हा केंद्राचा कायदा आहे. या कायद्यात एकूण पाच प्रमुख कलमे आहेत. त्यापैकी सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणे गुन्हा आहे. कोणत्याही शैक्षणिक संस्थेच्या 100 यार्ड आवारात तंबाखूजन्य पदार्थ विक्रीवर प्रतिबंध आहे. तसेच बालकांना किंवा बालकांकडून तंबाखूजन्य पदार्थ विक्री केल्यास 1 लाख रुपये आणि 7 वर्ष शिक्षेची तरतूद आहे. बाल न्याय कायद्यानुसार कारवाई करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे.
पालकांना धास्ती…
स्मार्टफोन व इंटरनेटमुळे सोशल माध्यमांवर मुलांना अनेक आमिषे उपलब्ध होत आहेत. त्यामुळे ते आभासी दुनियेत गुरफटत आहेत. त्याचा परिणाम त्यांच्या शैक्षणिक भविष्यावर होत आहे. त्यातच शाळा परिसरात तंबाखूजन्य पदार्थ सहज उपलब्ध होत असल्याने आपल्या पाल्याला याची सवय तर लागत नाही ना, याची धास्ती पालकांमध्ये वाढली आहे.