
जिंदल कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात उबाठा करनार जन आंदोलन
रत्नागिरी, : जिंदल कंपनीचा मनमानी कारभार सुरू आहे. 70 मुलांना वायू गळतीचा त्रास झाला तरी माणुसकी या नात्याने कंपनीने साधी रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली नाही. एक अधिकारी रुग्णालयात आला नाही. एवढी कंपनीची मुजोरी सुरू आहे. वायू गळती ही धोक्याची घंटा आहे. कंपनीमुळे अनेकजण बेघर झाले आहेत. कंपनीच्या या बेबंदशाहीविरोधात प्रशासनाने काही केले नाही तर ठाकरे शिवसेना जनआंदोलन छेडेल, असा इशारा उबाठाचे जिल्हा समन्वयक संजय पुनसकर यांनी दिला. या आंदोलनाबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे परवानगी मागण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
माजी खासदार विनायक राऊत यांच्या संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी शहर संघटक प्रसाद सावंत, विभागप्रमुख साजीद पावसकर उपस्थित होते. पुनसकर म्हणाले, जिंदल कंपनीमध्ये जी वायू गळती झाली त्याची वाहतुकीची प्रक्रिया योग्य हेच गळतीचे मूळ कारण आहे. जेव्हा जिंदल कंपनी 1992 ला आली तेव्हा खरेदीखत केली तेव्हा स्टील प्रकल्प होता. 2006 मध्ये यामध्ये बदल झाला आणि ऊर्जा प्रकल्प झाला. तेथे स्थानिकांना फिरकूनदेखील दिले जात नाही. काय चालले आहे हे कळत नाही. सामाजिक बांधिलकी म्हणून कंपनीची काही जबाबदारी होती. तातडीची उपाययोजना आवश्यक होती.
पंचक्रोशीमध्ये लोक आता या गळतीमुळे भितीच्या छायेत आहेत. कंपनीचे अधिकारी हात वर करत असतील तर जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घेण्याची गरज आहे. त्यांनी नाही घेतली तर जिंदाल कंपनीच्या विरोधात जनआंदोलन छेडले जाईल, असे पुनसकर यांनी सांगितले. सीएसआरच्या माध्यमातून किती मदत केली हे कधीच सांगितले गेले नाही. या बाधित 70 मुलांच्या आरोग्याची जबाबदारी आता कंपनीने घेतली पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.
—
चौकट
गेल कंपनीसाठी उतरवला जातो गॅस
जिंदल पोर्टवर बोटीद्वारे हा गॅस येतो आणि तेथून गेल कंपनीला सुमारे 90 किमी सप्लाय करण्यासाठी जोडला जातो; परंतु आता त्या प्रक्रियेमध्ये बदल झाला आहे. गॅस आता स्टोअर केला जातो; परंतु या सर्व प्रकारची जबाबदारी आरटीओ आणि कंपनीची आहे. आता गॅस गळतीची जबाबदारी कोणाची, असा प्रश्न पडला आहे.