
सहा कोटी ८० लाखाचा विमा लाभांश प्रलंबित
फळपीक विमा योजना; १५०० आंबा-काजू बागायतदार वंचित
रत्नागिरी: बदलत्या हवामानामुळे फळपिकांच्या उत्पादकतेवर होणाऱ्या परिणामांचा फटका बागायतदारांना होऊ नये यासाठी केंद्र व राज्यशासनाने पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजना राबवली आहे; मात्र जिल्ह्यातील सुमारे १५०० आंबा व काजू बागायतदारांना ६ कोटी ८० लाख रुपयांचा विमा परतावाच मिळालेला नाही. याबाबत बागायतदारांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
जिल्ह्यात आंबा बागायतीचे ६७ हजार हेक्टर तर काजूचे १ लाख हेक्टर क्षेत्र आहे. त्यामधून मोठी आर्थिक उलाढाल दरवर्षी होते. सुमारे दीड लाखाहून अधिक लोकांच्या उदरनिर्वाहाचे साधन म्हणून बागायती व्यवसायाकडे पाहिले जाते. फयान वादळानंतर सतत हवामानात होणाऱ्या बदलांचा फटका आंबा-काजू व्यवसायाला बसत आहे. बागायतदारांना दिलासा देण्यासाठी केंद्र व राज्यशासनाने फळपीक विमा योजना लागू केली आहे. अवकाळी पाऊस, कमी-जास्त तापमान, वेगाचा वारा, गारपिटीपासून संरक्षणासाठी फळपीक विमा योजना निर्धारित काळासाठी राबवण्यात येते. १५ मे रोजी विम्याचा कालावधी संपतो. त्यानंतर सप्टेंबरपर्यंत विमा परतावा बागायतदारांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरवात होते; मात्र यंदा उशिरा विमा लाभ मिळण्यास सुरवात झाली. रत्नागिरी जिल्ह्यातील ३६ हजार ८१८ बागायतदारांनी विमा उतरवला होता. वातावरणातील बदलांमुळे मोठे नुकसान २०२३-२४ या आर्थिक वर्षात सहन करावे लागले होते. त्या त्या महसूल मंडळात ट्रीगर अॅक्टिव्ह झाल्यामुळे परताव्यासाठी बागायतदार पात्र ठरले होते. यंदा ७३ कोटीचा विमा बागायतदारांना वाटप करण्यात आले आहे; परंतु शासनाकडील समभाग विमा कंपनीला कमी आल्यामुळे १ हजार ५०५ बागायतदार विमा परताव्यापासून वंचित आहेत. सुमारे १ हजार ६९ हेक्टर क्षेत्रावरील विमा लाभ मिळणे बाकी आहे. त्यामध्ये ८६० कर्जदार आणि ६८१ कर्ज न घेणारे बागायतदार आहेत. विमा उतरवण्यासाठी या बागायतदारांनी ५ लाख ५९ हजार ८०० रुपयांची रक्कम हप्त्यापोटी भरलेली आहेत. त्यांना ६ कोटी ८५ लाख रुपयांचा परतावा मिळणे बाकी आहे. राज्यशासनाकडील रक्कम प्राप्त झाल्यानंतर त्या बागायतदारांनी दिलासा मिळेल, असे सांगितले जात आहे.